Washim : शेतीला जोडी मधाची गोडी, मध उत्पादनातून शेतकऱ्यांने साधली आर्थिक उन्नती

| Updated on: May 21, 2022 | 7:47 AM

शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचा व्यवसाय केल्यास त्यांना शेतीला उत्तम जोडधंदा मिळेल आणि शेती उत्पादनातही वाढ होईल. पर्यावरण संवर्धनासाठीही त्याचा मोठा हातभार लागेल असं राजू जोगदंड यांनी सांगितले.

Washim : शेतीला जोडी मधाची गोडी,  मध उत्पादनातून शेतकऱ्यांने साधली आर्थिक उन्नती
शेतीला जोडी मधाची गोडी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वाशिम : निसर्ग चक्रात मधमाशांना अनन्य साधारण महत्व आहे. झाडांच्या परागिकरणाची महत्त्वपूर्ण प्रक्रिया ही मधमशां मार्फतच होते. मात्र शेतीमध्ये (Agriculture) वाढत्या कीटक नाशकांच्या फवारण्या आणि घातक रसायनांचा वापर यामुळे मधमाशांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. परिणामी निसर्गचक्र खंडित होऊन अन्न निर्मिती थांबू शकते आणि याचे गंभीर परिणाम मानवाला भोगावे लागतील त्यामुळे मधमाशी संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. नेमक्या याच उद्देशाने प्रेरीत होऊन वाशीम येथील राजु जोगदंड (Raju Jogdand) यांनी आपली शिक्षकाची नोकरी सांभाळुन मधुमक्षिका (Bee) सुरू केले आहे. त्यांनी शंभर मधमाशी पेट्यांपासुन सुरू केलेला जिल्हयातील पहिला मधुमक्षिका पालनाचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.”ज्या दिवशी मधमाश्या या जगातून नष्ट होतील, त्यानंतर केवळ चार वर्षांतच जग नष्ट होईल” सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अलबर्ट आईस्टाईन यांच्या या वाक्याने प्रेरित होऊन राजू जोगदंड यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. ते मधमाशांना वाचवण्यासाठी पर्यायाने जगाला वाचवण्यासाठी धडपडत आहेत.

शेतीला उत्तम जोडधंदा

शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचा व्यवसाय केल्यास त्यांना शेतीला उत्तम जोडधंदा मिळेल आणि शेती उत्पादनातही वाढ होईल. पर्यावरण संवर्धनासाठीही त्याचा मोठा हातभार लागेल असं राजू जोगदंड यांनी सांगितले. मधमाशी पालनाच्या व्यवसायातून राजू जोगदंड यांनी मागील वर्षात तब्बल २४ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. त्यांनी विविध पिकांमध्ये परागीकरणासाठी शेतकऱ्यांना पेट्या भाड्याने देणे, नवीन पेट्यांची निर्मिती करणे, मध विक्री तसेच मधावर प्रक्रिया करण्याच्या माध्यमातून लाखो रूपयांचा नफा कमावला आहे.

हे सुद्धा वाचा

विविध गावात जाऊन मोफत मार्गदर्शन

तरुणांनी मधमाशी पालनाकडे वळावं यासाठी राजू जोगदंड विविध गावात जाऊन त्यांना मोफत मार्गदर्शन करतात, कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रशिक्षिण शिबिरातही प्रशिक्षक म्हणून ते भाग घेतात.

शाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे धडे देतांना जोगदंड गुरुजींनी अध्यापनाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत मधुमक्षिका पालनाच्या यशस्वी प्रयोगातून जिल्हयातील शेतकऱ्यांनसमोर आदर्श निर्माण केला आहे.