काळाच्या ओघात लोप पावलेल्या ‘बरबडा’ मिरचीचा पुन्हा ठसका, काय आहे वेगळेपण?

| Updated on: Jan 26, 2022 | 7:01 AM

गेल्या काही दिवसांपासून मिरचीचे मुख्य आगार असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची चर्चा असली तरी मराठवाड्यात मात्र, ठसका आहे तो बरबडा मिरचीचा. काही वर्षापूर्वी जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरबडा येथील मिरचीचा ठसका महाराष्ट्रासह तेलंगणातही होता.

काळाच्या ओघात लोप पावलेल्या बरबडा मिरचीचा पुन्हा ठसका, काय आहे वेगळेपण?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून मिरचीचे मुख्य आगार असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Red Chilly) लाल मिरचीची चर्चा असली तरी (Marathwada) मराठवाड्यात मात्र, ठसका आहे तो बरबडा मिरचीचा. काही वर्षापूर्वी जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरबडा येथील मिरचीचा ठसका महाराष्ट्रासह तेलंगणातही होता. अस्सल गवाराण म्हणून या मिरचीची ओळख. परंतू, वातावरणातील बदल आणि (Pest outbreak) कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे लागवडीत मोठी घट झाली होती. काळाच्या ओघात लोप पावतेय का अशीच परस्थिती निर्माण झाली होती पण यंदा पुन्हा ही मिरची बरबडा शिवारात फुलली आहे. सध्या या मिरचीची तोडणी सुरु असून पुन्हा या मिरचीच्या मागणीत वाढ होईल असा आशावाद येथील शेतकऱ्यांना आहे.

काय आहे वेगळेपण?

नांदेड जिल्ह्यातील बरबडा गावच्या शिवारात या लाल मिरचीचे उत्पादन घेतले जात होते. गावरान असल्याने या मिरचीला अधिकची मागणीही होती. महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातून मोठी मागणी असलेल्या या मिरचीची मुख्य बाजारपेठ ही बरबडा हे छोटे गावच होते. चवदार असलेल्या या मिरचीमध्ये बियांचे प्रमाणही कमी होते. शिवाय लाल भडक असलेल्या मिरचीचे लोणचेही बनवले जात होते. तिखट पण चवदार हेच या मिरचीचे वेगळेपण होते. त्यामुळे लहान-मोठे व्यापारी थेट बरबडा गाव जवळ करुन मिरचीची खरेदी करीत होते. यामुळे गावातील अनेक शेतकरी हे सधनही झाले आहेत. आता पुन्हा काही वर्षानंतर या शिवारात मिरची फुलली असल्याने गतवैभव मिळेल असा आशावाद येथील शेतकऱ्यांना आहे.

हुमनी अळीच्या प्रादुर्भावामुळे अस्तित्व धोक्यात

सध्या वातावरणातील बदल आणि त्यामुळे वाढत असलेला कीडीचा प्रादुर्भाव हा प्रत्येक पिकासाठी धोकादायक ठरत आहे. अगदी त्याप्रमाणेच बरबडा शिवारातील या लाल मिरचीवर हुमनी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पीक उध्वस्त झाले होते. त्यामुळे पुन्हा लाल मिरचाचे उत्पादन मिळते की नाही अशी अवस्था होती. पण यंदा पोषक वातावरणामुळे बरबडा शिवारात लाल मिरचीचा ठसका उठलेला आहे. सध्या या मिरचीची तोडणी सुरु आहे. पूर्वीप्रमाणे अधिकच्या क्षेत्रावर लागवड नसली तरी बरबडा मिरचीची ओळख पुसणार नाही असे उत्पादन मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. पूर्वीप्रमाणेच मागणीही वाढेल आणि उत्पादनही वाढेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

बरबडा मिरचीच्या जागी तेजा मिरची

बरबडा या लाल मिरचीचे उत्पादन विशेषत: नांदेड जिल्ह्यातच होते. मात्र, प्रतिकूल परस्थितीमुळे या मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि तेजा मिरचीला अधिकचे महत्व प्राप्त झाले होते. या संकरीत मिरचीवरच नागरिकांना आपली गरज भागवावी लागली होती. पण पुन्हा या बरबडा शिवारात ही लाल मिरची फुलू लागली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात मागणी असलेली ही लाल मिरची गतवैभव मिळवून देणार असे चित्र सध्या नांदेड जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे.

संबंधित बातम्या :

Cabbage : केशरी रंगाचा कोबी ; 10 हजाराचा खर्च अन् 80 हजाराचे उत्पादन, उत्पन्न वाढीचा उत्तम मार्ग

अवकाळी, गारठ्यानंतर आता द्राक्ष बागायतदारांसमोर वेगळेच संकट, अंतिम टप्प्यात बागा सावरतेल का?

Untimely Rain: अवकाळीची अवकृपा सुरुच, आता थेट उत्पादनावर परिणाम