सामान्य गाड्यांपेक्षा EV चे टायर लवकर गुळगुळीत का होतात? ‘हे’ कारण तुम्हाला माहीत आहे का? अशी घ्याल काळजी
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. पण सामान्य गाड्यांच्या तुलनेत ईव्ही कारचे टायर वेगाने गुळगुळीत होतात हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामागे काही कारणं आहेत.. चला जाणून घेऊयात..

पेट्रोल डिझेलच्या गाड्यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक गाड्या खर्चाच्या दृष्टीने परवडणाऱ्या आहे. तसं पाहिलं तर इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमतीही महाग आहेत. पण रोजचा खर्चाचा अभ्यास केला तर तो तुलनेनं स्वस्त असतात असं म्हणायला हरकत नही. कारण पेट्रोल डिझेल भरण्यासाठी खर्च करण्याची गरज भासत नाही. इंजिन ऑइल बदलण्याची गरज पडत नाही. इतकंच काय तर गाडीमधील पार्टची सर्व्हिस करावी लागत नाही. पण असं असलं तरी ईव्ही गाड्या असलेल्यांच्या खिशाला मात्र एक भुर्दंड पडतो. हा भुर्दंड टायर झटपट गुळगुळीत होत असल्याने पडतो. इलेक्ट्रीक वाहनांची काही प्रकरणं समोर आली आहेत. यात पेट्रोल डिझेल कारच्या तुलनेत ईव्हीचे टायर 20 ते 30 टक्के लवकर गुळगुळीत होतात. भारतातील खराब रस्त्यांमुळे हे प्रमाण अधिक वाढू शकते. पण ईव्ही कारचे टायर घासण्याचं कारण तरी काय? एकाच रस्त्यावर इंधन आणि इलेक्ट्रिक कार धावतात. मग असं वेगळं काय घडतं?
ईव्ही कारचे टायर लवकर का गुळगुळीत होतात?
इलेक्ट्रिक कारचे टायर झटपट गुळगुळीत होण्याची तीन प्रमुख कारणं आहेत. टायर निर्माता Michelin यांच्या मते, कारचं वजन हे सर्वात प्रमुख कारण आहे. इलेक्ट्रिक कारमध्ये मोठी बॅटरी असते. त्यामुळे त्याचं वजन अधिक असतं. त्यामुळे त्याचा भार अखेर टायरवरच पडतो. त्यामुळे वळण घेताना, ब्रेक लावताना आणि गाडी चालवताना टायरवर जोर येतो आणि ते अधिक प्रमाणात घासतात. दुसरं कारण म्हणजे इंस्टंट टॉर्क.. पेट्रोल आणि डिझेल हळूहळू वेग घेते. पण इलेक्ट्रिक कारमध्ये चालू करताच टॉर्क देऊ शकतो. एक्स्प्रेस वे वर गाडी चालवताना अचानक वेग वाढवल्याने टायरवर भार पडतो. तिसरं म्हणजे रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग.. ईव्ही कारचा वेग कमी करण्यासाठी मोटरचा वापर होतो. त्यामुळे बॅटरीत ऊर्जा परत जाते. या प्रक्रियेत गाडीचा वेग कमी करण्यासाठी टायरही मुख्य भूमिका बजावतात.
ईव्ही कार चालकांनी कशी काळजी घ्यावी
ईव्ही कार मालकांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. टायरमधील हवा महिन्याला नाही तर आठवड्याला तपासावी. गाडी 10 हजार किलोमीटर चालल्यानंतर टायर रोटेशन केल्यानंतर त्याची झीज समान राखण्यास मदत होते. 15 हजार किलोमीटर होताच व्हील अलाइनमेंट तपासावं. गाडी खड्ड्यातून जाताना जोरात आपटली असेल तर तात्काळ ही बाब तपासणं गरजेचं आहे. शहरात आणि ट्राफिकमध्ये अचानक वेग वाढवणं टाळावं. इतकंच काय तर गाडी खूप हळू चालवली तर टायरवर पडणारा दाब कमी करू शकतो. कारचे टायर एक्सएल किंवा एचएएल सांगितले असतील तर पैसे वाचवण्याच्या नादात कोणतेही टायर वापरू नका.