किमान सभ्यता तरी हवी.. ‘रंभा हो..’ फेम अभिनेत्रीची नाराजी; 70 व्या वर्षी काम मागितल्यावर मिळतेय अशी वागणूक
'रंभा हो..' या गाण्यामुळे तुफान लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेत्री कल्पना अय्यर गेल्या अनेक दिवसांपासून कामाची मागणी करत आहेत. मात्र त्याबदल्यात त्यांना मिळणारी वागणूक निराशाजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय.

‘रंभा हो..’ या गाण्याची धून आजही अनेकांच्या आठवणीत ताजी आहे. या आयकॉनिक गाण्यामुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री कल्पना अय्यर सध्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. मात्र यावेळी कारण त्यांचा ग्लॅमरस अंदाज किंवा डान्स नसून, 70व्या वर्षी पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष हे आहे. काम मागताना काही जण साधं उत्तरही देत नसल्याची खंत त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून व्यक्त केली आहे. कल्पना अय्यर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की, त्यांना कोणतीही विशेष वागणूक किंवा सहानुभूती नको आहे. त्यांना फक्त प्रामाणिकपणे काम करण्याची संधी हवी आहे. एखादा प्रोजेक्ट त्यांच्यासोबत होणार नसेल, तरी त्यांना तसं स्पष्टपणे सांगावं, अशी त्यांची अपेक्षा आहे.
कल्पना अय्यर यांची पोस्ट-
‘मी प्रत्येक गोष्टीबाबत सभ्य राहण्याचा प्रयत्न करत आहे आणि ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात नाहीत, त्याबद्दल नाराज न होण्याचाही प्रयत्न करत आहे. पण खरं सांगायचं तर, माझ्यासाठी हे योग्य नाहीये. कारण माझ्यासमोर जे काही काम येईल, ते मला करायचं आहे आणि मला एखाद्या ‘दिवा’सारखं (नखरे करणाऱ्या सेलिब्रिटीसारखं) वागवलं जावं, अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. फक्त सभ्यता आणि आदराने वागा, एवढीच माझी अपेक्षा आहे. मी प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी होईल, अशी अपेक्षा करत नाही. कारण हे एक नवीन जग आहे आणि मला हे समजण्याइतकी जाणीव आहे की काळ बदलला आहे. लोकांचे स्वतःचे नियम आणि अजेंडा असतात आणि कदाचित मी त्यांना ज्या व्यक्तीला पाठिंबा द्यायचा आहे, ती व्यक्ती नसेन. पण मी एक माणूस आहे. मला कोणत्याही सहानुभूतीची किंवा विशेष वागणुकीची गरज नाही. मला फक्त योग्य आणि समान वागणूक हवी आहे,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

तुम्ही माझ्याशी संपर्क साधलात तर मी त्याबद्दल आभारी आहे. पण जर ते शक्य नसेल, तर मला सांगा, मला कळवा, माझ्याशी बोला. मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि कदाचित काही बदल करून पर्यायही देईन. तुम्हाला कधीच माहीत नसतं.. कदाचित एखादा पर्याय तुमच्यासाठी आणि माझ्यासाठीही काम करेल. त्यामुळे कृपया स्वतःहून काही गृहीत धरू नका किंवा अंदाज बांधू नका. फक्त मला विचारा. मी आनंदाने आणि मनापासून आभारी राहीन. मी कोणत्याही एका व्यक्तीचं किंवा विशेष व्यक्तींचं नाव घेत नाहीये, कारण या पोस्टचा उद्देश तो नाही,’ अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कल्पना अय्यर यांनी अवघ्या 12व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. देव आनंद यांच्या ‘लूटमार’ चित्रपटातील डान्स नंबरमधून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर ‘रंभा हो’ या लोकप्रिय गाण्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील कामाच्या संधी कमी झाल्यानंतर त्या 1999 मध्ये दुबईला गेल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून तिथे राहत आहेत. दरम्यान, धुरंधर चित्रपटात ‘रंभा हो’ गाण्याचा संदर्भ आल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या. त्यांच्या एका लग्नातील डान्सचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
