‘मी रतन टाटा बोलतोय.. आपण भेटू शकतो का?’ ; एका फोनमुळे बदललं पुण्यातील अदिती भोसलेच्या ‘रेपोस एनर्जी’ चं नशीब !

| Updated on: Aug 08, 2022 | 12:30 PM

'रेपोस एनर्जी' या स्टार्टअप कंपनीने नुकतेच मोबाईल इलेक्ट्रिक चार्जिंग वाहन लाँच केले. या स्टार्टअप कंपनीत टाटा समूहाची गुंतवणूक आहे. देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या एका फोनमुळे नशीब कसे बदलले, त्यांची भेट कशी झाली, याचा अनुभव रेपोस एनर्जीच्या अदिती भोसले वाळुंज यांनी 'लिंक्डइन' वर शेअर केला आहे.

मी रतन टाटा बोलतोय.. आपण भेटू शकतो का? ; एका फोनमुळे बदललं पुण्यातील अदिती भोसलेच्या रेपोस एनर्जी चं नशीब  !
Aditi Bhosale Walunj
Image Credit source: Aditi Bhosale Walunj/Linkedin
Follow us on

पुण्यातील अदिती भोसले- वाळुंज आणि चेतन वाळुंज यांनी ‘रेपोस एनर्जी’ (Repos energy) नावाचे स्टार्टअप सुरू केले. सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या टाट समूहाने या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘रेपोस एनर्जी’ तर्फे नुकतेच सेंद्रिय कचऱ्यावर चालणारे ‘मोबाईल इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेईकल’ सोल्यूशन (Mobile Electric Charging Vehicle) लाँच करण्यात आले आहे. मात्र या स्टार्टअपची सुरूवात नेमकी कशी झाली , त्याला टाटा समूहाचे पाठबळ कसे मिळाले याबद्दलची माहिती अदिती यांनी ‘लिंक्डइन’ वर एका पोस्टमधून शेअर केली आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांच्या एका फोन कॉलमुळे आपलं आणि रेपोस एनर्जीचं नशीब कसं बदललं, याचा एका अद्भुत किस्साच त्यांनी लिंक्डइनवर (Linkedin post) शेअर केला आहे.

काय आहे अदिती यांची लिंक्डइन वरील पोस्ट

या पोस्टमध्ये अदिती सांगतात, ” रतन टाटा आणि आमची भेट, ही काही एक सामान्य गोष्ट नव्हे. तो एक अदभुत क्षण होता. त्या भेटीनंतर आमचं नशीबचं बदललं. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी आणि चेतनने ‘रेपोस’ चा प्रवास सुरू केला तेव्हा आम्हाला एका मार्गदर्शकाची आवश्यकता होती. हे स्टार्टअप गतीमान व्हावे, यासाठी ज्यांना या क्षेत्रातील भरपूर अनुभव आहे अशा एक मेंटॉरची आपल्याला गरज आहे, असे मला व चेतनला वाटत होते. आणि त्याक्षणीच आमच्या दोघांच्याही मनात नाव आले ते ‘रतन टाटा ‘ यांचे… मी चेतनला म्हटलं देखील, ‘चल, आपण त्यांना भेटूया’. ‘एवढ्या सहज त्यांची भेट व्हायला ते ( रतन टाटा) काही माझे शेजारी नाहीत, अदिती,’ असं चेतन म्हणाला, असे अदिती यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांना अनेकांनी सांगितलं की, रतन टाटांची भेट अशक्य आहे. ”

कशी झाली भेट ?

मात्र त्यामुळे निराश न होता, अदिती यांनी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले. रतन टाटा यांची भेट घ्यायचीच असा चंगच त्यांनी बांधला. काही दिवसांतच त्यांनी मुंबई गाठली. तंत्रज्ञानाचा वापर करून उर्जेचे वितरण कसे बदलायचे आणि उर्जा /इंधन शेवटच्या मैलापर्यंत कसे पोहोचवायचे, याचे एक 3 डी प्रेझेंटेशन अदिती व चेतन यांनी तयार केले. त्यानंतर, त्यांनी रतन टाटा यांना स्वलिखित पत्र व हे 3 डी प्रेझेंटेशन पाठवले. तसेच काही व्यक्तींच्या मदतीने रतन टाटा यांना भेटण्यासाठी प्रयत्नही सुरू ठेवले. त्यासाठी ते तब्बल 12 तास रतन टाटा यांच्या घराबाहेर थांबले होते. अखेर थकून भागून रात्री जेव्हा ते हॉटेल रूमवर पोहोचले, तेव्हा रात्री 10 च्या सुमारास त्यांना एक कॉल आला. अदिती यांनी फोन उचलला असता ‘ हॅलो, मी अदिती यांच्याशी बोलू शकतो का?’, असा आवाज आला. तेव्हा अदिती यांनी कोण बोलत आहे अशी विचारणा केली असता ‘ मी रतन टाटा बोलतोय. मला तुमच पत्र मिळाले. आपण भेटू शकतो का ? ‘ असे वाक्य अदिती यांच्या कानावर पडले. ते ऐकताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या अंगावर (आनंदाने) काटा आला होता, डोळ्यात अश्रू तरळले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10.45 अदिती व चेतन, रतन टाटा यांच्या घरी पोहोचले. बरोब्बर 11 वाजता निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या रतन टाटांशी त्यांची भेट झाली, असे अदिती यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

त्या दिवशी सकाळी 11 पासून ते दुपारी 2 पर्यंत अदिती व चेतन यांची रतन टाटा यांच्यासमोर प्रेझेंटेशन दिले. त्यांचे काम व ध्येय याबद्दल माहिती दिली. त्यानंतर 2019 साली टाटा समूहाने रेपोस एनर्जीमध्ये पहिली गुंतवणूक केली. आणि एप्रिल 2022 मध्ये दुसरी गुंतवणूकीही करण्यात आली. टाटा समूहाशिवाय रेपोस एनर्जीची ही घोडदौड अशक्य होती, अशा शब्दांत अदिती यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.