दिलासादायक! खाद्यतेलाच्या दरात 9 टक्क्यांची घसरण; पुढील काळात तेल आणखी स्वस्त होणार

| Updated on: Jun 11, 2022 | 2:01 PM

दिलासादायक बातमी आहे. खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. भविष्यात तेलाचे दर आणखी स्वस्त होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

दिलासादायक! खाद्यतेलाच्या दरात 9 टक्क्यांची घसरण; पुढील काळात तेल आणखी स्वस्त होणार
खाद्यतेलाच्या दरात घसरण
Image Credit source: t v 9
Follow us on

मुंबई : देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. अन्नाधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत (Vegetables) आणि इंधनापासून (Fuel) ते खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. मात्र वाढत्या महागाईत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गेल्या महिनाभरात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये 9 टक्क्यांनी घसरण झाली आहे. खाद्यतेल स्वस्त झाले असून, पुढील काही महिन्यांमध्ये खाद्यतेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने किमती कमी झाल्या आहेत. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल तेल, मोहरीचे तेल, पाम ऑईल आणि नारळ तेलाच्या दरात दोन ते तोरा टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. त्याचा परिणाम हा भारतीय बाजारपेठेवर देखील झाला असून, सूर्यफूलाचे तेल वगळता भारतात इतर तेलाचे दर स्वस्त झाले आहेत.

इंडोनेशियाने निर्यातीवरील निर्बंध उठवले

सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, देशात सध्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 2 ते 9 टक्क्यांपर्यंतची घसरण पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भारतात खाद्यतेलाच्या दरात मोठी तेजी पहायला मिळत होत. त्यामागे दोन कारणे होती. एक तर रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध तर दुसरे इंडोनेशियाने अचानक बंद केलेली पाम तेलाची निर्यात. मात्र आता पुन्हा एकदा इंडोनेशियाकडून खाद्य तेलाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे भारतात होणारा तेलाचा पुरवठा वाढला आहे. तसेच आरबीआयने वाढवलेल्या रेपो रेटचा परिणाम देखील दिसून येत आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पुढील काळात खाद्यतेलाचे दर आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

वाढत्या तापमानामुळे खाद्यतेलाच्या मागणीत घट

केडिया अ‍ॅडवायझरीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, चालू वर्षात देशात उष्णतेने उच्चांक गाठला होता. तापमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. उष्णता अधिक असेल तर तेलाच्या मागणीत घट होते. यंदा मोठ्याप्रमाणात तेलाची मागणी घटली. तसेच आता लग्नांचा हंगाम देखील लवकरच संपणार आहे. एकिकडे तेलाचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र मागणीमध्ये घट झाल्याने तेलाचे दर स्वस्त झाले आहेत. येणाऱ्या काळात तेलाचे दर आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यात येत आहेत. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे.