बाजारातील पडझडीतही कमाईची संधी; या गोष्टींकडे ठेवा लक्ष्य, नुकसान टाळणे हा पण फायद्याच की!

| Updated on: Jun 19, 2022 | 1:27 PM

शेअर बाजारातील घडामोडींमुळे गुंतवणुकदार भयभीत झाला आहे. बाजाराकडून घोर निराशा त्याच्या पदरात पडली आहे. अशावेळी योग्य रणनीतीच त्याच्या उपयोगी पडू शकते. गुंतवणूक करताना भावनिक न होता, अभ्यास आणि संयमाचा वापर केल्यास गुंतवणुकदारांना पडत्या काळातही कमाईच्या संधी मिळू शकतात.

बाजारातील पडझडीतही कमाईची संधी; या गोष्टींकडे ठेवा लक्ष्य, नुकसान टाळणे हा पण फायद्याच की!
पडत्या बाजारातही कमाईची संधी
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

शेअर बाजारात (Share Market) सध्या धडामधूम सुरु आहे. मोठ्या आशेने गुंतवणुकदार बाजारात दाखल होतात. रक्कम गुंतवतात आणि बाजार वधरण्याची आशा बांधतात. पण सध्या बाजाराने त्यांची साथ सोडली आहे. बाजाराच्या या रौद्ररुपाने गुंतवणुकदार(Investor) भयभीत झाले आहे. नवख्या उमेदवारांची मोजदाद न करणेच बरे, कारण सगळ्यांचे मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आठवड्यात बाजाराने गुंतवणुकदारांची शिकार केली. बाजार 2943 पॉईंटसने म्हणजे 5.41 टक्क्यांनी धराशायी (Crash) झाला. तरीही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ही पण एक संधी आहे. या संधीचा फायदा करुन घेण्याचे कौशल्या गुंतवणुकदारांना तेवढे दाखवावे लागेल. अशावेळी बाजारातील काही स्ट्रेटर्जी (Strategy) तुमच्या कामी येऊ शकतात. ही रणनीती त्यांना फायदा मिळवून देऊ शकते. अथवा नुकसानीपासून त्यांना वाचवू शकते. दोन्ही प्रकारात फायदा गुंतवणुकदारांचाच होणार आहे. काय आहे ही रणनीती समजून घेऊयात..

भीतीपोटी ब्रम्हराक्षस

भीतीपोटी ब्रम्हराक्षस ही म्हण कायम लक्षात ठेवा. नाहक कुठलीही गुंतवणूक करु नका. गडबडीत, घाबरुन कुठलीही गुंतवणूक करु नका. बाजार आणि अर्थव्यवस्था परस्परपुरक असतात. त्यांचा परिणाम दिसून येतोच आणि सध्या सुरु असलेली एक सायकल आहे. ये दिन बी जायंगे हे लक्षात ठेवा. आता पडझड सुरु आहे, उद्या बाजार तेजीत असेल. हे चक्र आहे. निराश होऊ नका. अभ्यासून प्रकटावे ही खूणगाठ बांधा.

SIP आहे ना मदतीला

शेअर बाजार सध्या त्याच्या उच्चस्तरावरुन पार खाली घसरला आहे. तरीही गुंतवणुकदारांनी योग्य ठिकाणी गुंतवणुक केल्यास त्याला फायदा होऊ शकतो. पण ही गुंतवणूक एकरक्कमी न करता, पद्धतशीर गुंतवणूक योजनेमार्फत (SIP) केल्यास त्याचे होणारे नुकसान कमी तर होईलच. पण त्याची गुंतवणूक ही सुरु राहील. भविष्यात बाजार वधरल्यास ही गुंतवणूक त्याला फायदेशीर ठरू शकते.

हे सुद्धा वाचा

पोर्टफोलिओअसावा वैविध्यपूर्ण

पोर्टफोलिओतील विविधता ही पडत्या बाजारात तुमचे गुंतवणूक मूल्य स्थिर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करते. पोर्टफोलिओत सर्वप्रकारचे शेअर आणि फंड असतील तर बाजारातील पडझडीचा एकसारखा परिणाम दिसून येणार नाही. जर एकीकडे इक्विटीत नुकसान होत असेल. बाजार घसरला असेल तर दुसरीकडे सोने अथवा दुस-या गुंतवणुकीतून तुम्हाला हे नुकसान भरुन काढण्याची संधी मिळेल.

पडझडीत शेअर विक्री नुकसानीचे

तेजी आणि मंदी हा बाजाराचा स्वभाव आहे. गुंतवणुकदारांनी ही गोष्ट पक्की मनाशी बांधावी. बाजार पडल्याने त्यांनी घाबरुन जाऊ नये. तुम्ही जो पैसा शेअर बाजारात गुंतवला आहे, तो अशावेळी लगेच काढण्याची घाई करु नये. त्यामुळे उलट नुकसानच जास्त होण्याची भीती आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीत, बाजार एकाच भावमुद्रेत स्थिर नसतो. तो बदलत असतो. मंदीनंतर तेजी येणार आहे. असे अनेकदा झाले आहे. त्यामुळे गडबडीत शेअरची विक्री करु नये.

स्टॉक बास्केट आहे तरी काय

सध्या स्टॉक बास्केट ही संकल्पना नव्याने उभरत आहे. या संकल्पनेनुसार, तुमच्याकडील शेअरची एक बास्केट बनविण्यात येते आणि त्यात तुमचे शेअर असतात. म्हणजे जर बास्केटमधील पाच शेअरमध्ये तुम्ही 25 हजारांची गुंतवणूक करु इच्छित असाल तर प्रत्येक शेअरसाठी प्रत्येकी पाच हजारांची गुंतवणूक करण्यात येईल.

स्वयंशिस्त महत्वाची

शेअर बाजारातील पडझड हे एक चक्र आहे. पण या सर्वात महत्वाची बाब आहे ती स्वयंशिस्तीची. तुम्हाला दीर्घकालीन फायदा मिळवायचा असेल तर अभ्यास आणि स्वयंशिस्त अंगी भिनवावी लागेल. अशा नकारात्मक काळात ही विचारपूर्वक गुंतवणूक करणे आणि पोर्टफोलिओत बदल करणे फायद्याचे ठरेल.