Ratan Tata : माझ्याविषयी विचार केल्याबद्दल धन्यवाद… रतन टाटा यांचे समाज माध्यमावर तो अखेरचा संदेश काय?

Ratan Tata last words : उद्योग जगतातील दिग्गज रतन टाटा यांना काळाने आपल्यातून हिरावून नेले. त्यांच्या निधानाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात सुद्धा ते सक्रिय होते. ते अनेक सामाजिक कार्यात सहभागी होत होते तर फावल्या वेळात सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय होते.

Ratan Tata : माझ्याविषयी विचार केल्याबद्दल धन्यवाद... रतन टाटा यांचे समाज माध्यमावर तो अखेरचा संदेश काय?
रतन टाटा यांचा अखेरचा संदेश काय?
| Updated on: Oct 10, 2024 | 5:16 PM

उद्योग जगातातील दिग्गज रतन टाटा आता आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या निधनाने अनेकांचा आधारवड हरवला आहे. ते अनेक नव तरुण उद्योजकांचे प्रेरणास्थान होते. त्यांचे विचार, कल्पना ऐकण्यासाठी तरुणाई कानात प्राण आणायची. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात सुद्धा ते सक्रिय होते. ते अनेक सामाजिक कार्यात सहभागी होत होते तर फावल्या वेळात सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय होते. रुग्णालयात भरती झाल्यावर त्यांनी तीन दिवसांपूर्वी एक पोस्ट समाज माध्यमांवर शेअर केली. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. हेच त्यांचे अखेरचे शब्द ठरले. काय होतं त्या पोस्टमध्ये?

माझ्याविषयी विचार केल्याबद्दल धन्यवाद…

रतन टाटा यांनी समाज माध्यमावर एक खास पोस्ट तीन दिवसांपूर्वी शेअर केली. त्यात त्यांनी त्यांच्या आरोग्याविषयीची अपडेट आणि अफवांविषयीचा ऊहापोह केला आहे. त्यात त्यांनी माझ्याविषयी विचार केल्याबद्दल धन्यवाद असे लिहित पुढे लिहिले आहे की-

“माझ्या आरोग्याविषयी नुकत्याच काही अफवाविषयी मला माहिती आहे आणि सर्वांना निश्चितपणे सांगतो की हे सर्व दावे निराधार आहेत. वय आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या तपासण्या मी करत आहे. चितेंचे कोणतेही कारण नाही. मी चांगल्या मनोस्थितीत आहे. माध्यमं आणि लोकांना विनंती करतो की, कोणतीची चुकीची माहिती पसरवू नये.”

काय आहे घटनाक्रम?

रतन टाटा यांची रविवारी रात्री अचानक प्रकृती खालावली. त्यांना रात्री उशीरा रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यांना मध्यरात्री 12.30 ते 1 वाजेच्या दरम्यान तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मुंबईतील ब्रीच कँडी येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाले. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती. दरम्यान टाटा यांनी ट्विटवर वरील पोस्ट शेअर केली.

दोन दिवसांत त्यांची तब्येत चांगली होईल, अशी आशा होती. पण कमी रक्तदाबाने पुन्हा त्यांची तब्येत पूर्णपणे बिघडली. त्यांची तब्येत खालवत गेली. रक्तदाब कमी झाल्याने शरिरातील इतर अवयवांवर परिणाम झाला. ते निकामी झाले. या सर्व बाबी होत असताना त्यांना डिहायड्रेशनही झाले. बुधवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. वरळीतील स्माशनभूमीत शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार होणार आहे.