सलग पाचव्या महिन्यात दणका, महागाईत मोठी वाढ; आकडेवारीने नागरिकांची उडाली झोप

Inflation Hike : सलग पाचव्या महिन्यात महागाई दरात वाढ नोंदवली गेली आहे. मे 2026 मध्ये किरकोळ महागाई वाढून 3.93 टक्क्यांवर पोहोचली असून एप्रिलमध्ये ती 3.48 टक्के होती.

सलग पाचव्या महिन्यात दणका, महागाईत मोठी वाढ; आकडेवारीने नागरिकांची उडाली झोप
Inflation Hike in India
Image Credit source: Google
| Updated on: Jun 12, 2026 | 7:33 PM

गेल्या काही काळापासून देशातील महागाई पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मे 2026 मध्ये किरकोळ महागाई वाढून 3.93 टक्क्यांवर पोहोचली असून एप्रिलमध्ये ती 3.48 टक्के होती. सलग पाचव्या महिन्यात महागाई दरात वाढ नोंदवली गेली आहे. महागाईचा हा दर अद्याप RBI च्या 4 टक्के लक्ष्याच्या आसपास असला, तरी वाढत्या किमतींमुळे आगामी महिन्यांबाबत चिंता वाढली आहे. कारण आता आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सर्वात मोठी मासिक वाढ

सरकारी आकडेवारीनुसार, मे महिन्यात महागाईत झालेली वाढ ही यंदातील सर्वात मोठी मासिक वाढ ठरली आहे. जानेवारीमध्ये महागाई दर 2.74 टक्के होता. त्यानंतर तो हळूहळू वाढत मे महिन्यात 3.93 टक्क्यांपर्यंत पोहोचला. यावरून वस्तूंच्या किमतींवरील दबाव सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अन्नधान्याच्या किमतीत वाढ

महागाई वाढण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे अन्नपदार्थांच्या किमतींमध्ये झालेली वाढ. मे महिन्यात अन्नधान्य महागाई 4.78 टक्क्यांवर पोहोचली, जी एप्रिलमध्ये 4.20 टक्के होती. ग्रामीण भागात अन्नधान्य महागाईचा दर 4.85 टक्के राहिला, जो शहरी भागाच्या तुलनेत अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, भाज्या आणि इतर अत्यावश्यक खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर परिणाम झाला आहे.

हॉटेल आणि सेवा क्षेत्रातही महागाईचा भडका

अन्नपदार्थांबरोबरच विविध सेवांच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. रेस्टॉरंट्स तसेच खाद्यसेवांशी संबंधित महागाईचा दर 5.7 टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे बाहेर जेवण करणे आणि हॉटेलमधील सेवांचा वापर करणे पूर्वीपेक्षा अधिक खर्चिक झाले आहे. याचा फटका देशातील जनतेला बसला आहे.

इंधन दरवाढीचाही परिणाम

मे महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये अनेकदा वाढ झाली. त्याचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर झाला आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे मालवाहतूक महागली आणि त्याचा परिणाम दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतींवरही दिसून आला. पश्चिम आशियातील सुरू असलेला तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे देशातील महागाईत वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होत आहे. अन्नपदार्थ, इंधन आणि वाहतूक सेवा महागल्याने अनेकांचे बजेट बिघडले आहे.

Follow Us