‘स्टार्टअप’चा कर्मचाऱ्यांना झटका, गेल्या तीन महिन्यांत दहा हजारांहून अधिक जणांनी गमावली नोकरी

| Updated on: Jun 12, 2022 | 8:44 AM

स्टार्टअप कंपन्यांकडून सध्या कर्मचारी कपातीचा धडाका सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये दहा हजारांहून अधिक जणांनी आपली नोकरी गमावली आहे.

स्टार्टअपचा कर्मचाऱ्यांना झटका, गेल्या तीन महिन्यांत दहा हजारांहून अधिक जणांनी गमावली नोकरी
Image Credit source: unsplash.com
Follow us on

मुंबई : देशावर गेले दोन वर्ष कोरोनाचे (Corona) संकट होते. कोरोनाच्या संकटातून सावरत असतानाच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेमधील उलाढाल मंदावली. यामुळे अर्थव्यवस्थेला (Economy) मोठा फटका बसला. या युद्धांच्या परिणामातून सावरत असतानाच आता वाढत असलेली महागाई (Inflation) ही एक प्रमुख समस्या बनली आहे. एकामागून एक येत असलेल्या या संकटाचा मोठा फटका हा उद्योग जगताला बसला आहे. स्टार्टअप कंपन्यांवर या संकटांचा मोठा परिणाम झाला आहे. भारतात सध्या स्टार्टअप कंपन्यांची संख्या वेगाने वाढत आहे. ही देशासाठी चांगली गोष्ट आहे. स्टार्टअप कंपन्यांमुळे अनेकांना रोजगार मिळाले. मात्र आता याच स्टार्टअप कंपन्या मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात करताना दिसून येत आहेत. आतापर्यंत जवळपास दहा हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना स्टार्टअप कंपन्यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. वाढती महागाई आणि आरबीआयने वाढवलेल्या रेपो रेटमुळे कर्ज महाग झाल्याने कर्मचारी कपात करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

उत्पादनापेक्षा खर्च अधिक

सध्या महागाईमध्ये वाढ झाली आहे. दुसरं म्हणजे आरबीआयकडून मे आणि जून असा सलग दोनदा रेपो रेट वाढवण्यात आला आहे. कोरोनाचे सावट, त्यानंतर सुरू झालेले रशिया आणि युक्रेन युद्ध आणि आता जगभरात उडालेला महागाईचा भडका यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीचे समिकरणच पूर्णपणे बदलले आहे. अनेक वस्तुंच्या मागणीत घट झाली आहे. तर काही वस्तुंच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. अशा स्थितीत स्टार्टअप उद्योजकांचा उत्पादनापेक्षा  खर्चच अधिक होत असल्याने अनेक स्टार्टअप कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत आठ ते दहा हजार कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार पुढील काळात आणखी कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे.

या कारणांमुळे कर्मचारी कपात

कर्मचारी कपातीला वाढती महागाई हे एक मुख्य कारण आहे. दुसरे म्हणजे सध्या शेअर मार्केटची स्थिती वाईट झाली आहे. शेअर मार्केटमध्ये पडझड सुरूच आहे. स्टार्टअप कंपनी झोमॅटो, पेटीयम, नायका या सारख्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहेत. दुसरीकडे वाढत्या महागाईला कट्रोल करण्यासाठी कर्ज घ्यावे तर ते रेपो रेट वाढवल्यामुळे महाग झाले आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. तसेच आयात, निर्यात मोठ्याप्रमाणात प्रभावित झाली आहे. त्यामुळे स्टार्टअप कंपन्या सध्या कर्मचारी कपात करताना दिसून येत आहेत.

हे सुद्धा वाचा

या कंपन्यांकडून कर्मचारी कपात

सध्या सर्वच कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. मात्र त्यातही स्टार्टअप कंपन्या आघाडीवर आहेत. फेब्रुवारीमध्ये Lido Learning या कंपनीने तब्बल 1200 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्यानंतर Unacademey या कंपनीकडून एप्रिल महिन्यात 925 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली. Vedantu ने एप्रिल महिन्यात 600 कर्मचाऱ्यांची कपात केली. तर FrontRow 145 कर्मचाऱ्यांची कपात केली. Meesho, OKCredit, Cars24, MFine या कंपन्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात आली आहे.