
अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं होतं. 9 कोटी रुपयांचं कर्ज फेडू न शकल्याने आणि चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी राजपालला शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर चेक बाऊन्स प्रकरणाविषयी देशभरात बरीच चर्चा झाली. देशात कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड करण्याचं विसरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर कर्ज घेणाऱ्यांमध्ये तरुण पिढीच सर्वांत पुढे आहे. अशी अनेक उदाहरणं समोर आली आहेत, ज्यामध्ये दरमहा पगाराच्या तुलनेत 100 पटीने जास्त रकमेचा लोन घेण्यात आला आहे. नंतर याच लोनचे हफ्ते फेडण्यात ते अपयशी ठरतात. याचमुळे देशभरात चेक बाऊन्सची प्रकरणं वाढत चालली आहे. ‘इकोनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, दर महिन्याला 25 ते 35 वयोगटातील शेकडो तरुण कर्जाच्या जाळ्यात अडकत आहेत.
1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या पिढीने आपल्या डोक्यावर कर्जाचं मोठं डोंगरच उभं केलं आहे. ही पिढी त्याच्या आधीच्या पिढ्यांपेक्षा खूप वेगळी आहे. मासिक पगार 30 ते 40 हजार रुपये असताना ही पिढी 30 ते 40 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेत आहे. या कर्जाच्या सापळ्यामागील मुख्य कारण म्हणजे कर्जाद्वारे उत्पन्न आणि खर्चातील तफावत भरून काढणं. परंतु हीच तफावत नंतर नियंत्रणाबाहेर जात आहे.
देशात चेक बाऊन्सच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. आकडेवारीनुसार देशात 43 लाखांहून अधिक चेक बाऊन्सचे खटले प्रलंबित आहेत. चेक बाऊन्सच्या प्रकरणांमध्ये दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पाच राज्यांमध्ये 33 लाखांहून अधिक चेक बाऊन्स झाले आहेत. चेक बाऊन्सची सर्वाधिक प्रकरणं ही महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात 56 लाख चेक बाऊन्सची प्रकरणं प्रलंबित आहेत. तर 48 लाख चेक बाऊन्स प्रकरणांसह गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. फक्त पुण्यातच 30.15 कोटी रुपयांचे 780 चेक बाऊन्स झाले आहेत.