Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात मोठी कारवाई सुरू होणार असून मंदिर परिसरातील दुकाने आणि मिळकतींचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने यासंदर्भात आढावा बैठक पार पडली असून मंदिर परिसरातील सर्व मिळकतींचे मूल्यांकन महिन्याभराच्या आत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात मोठी कारवाई सुरू होणार असून मंदिर परिसरातील दुकाने आणि मिळकतींचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने यासंदर्भात आढावा बैठक पार पडली असून मंदिर परिसरातील सर्व मिळकतींचे मूल्यांकन महिन्याभराच्या आत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मूल्यांकनानंतर अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 1400 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात हे काम हाती घेतले जाणार आहे. यामध्ये मंदिर परिसरातील छोटी-मोठी दुकाने आणि जागा संपादित करण्यात येणार आहेत. मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर संबंधित मिळकतधारकांना मोबदला म्हणून रोख रक्कम किंवा पर्यायी जागा देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू असतानाच बाहेरील अतिक्रमणे आणि दुकानांचे स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात मंदिर परिसरातील अनेक दुकाने हटवली जाण्याची शक्यता आहे.

