पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठी बातमी, सरकारची महत्त्वाची घोषणा

| Updated on: Mar 26, 2024 | 9:33 PM

राज्यात गृह विभागाकडून पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 17 हजार 700 पोलिसांची भरती केली जाणार आहे. या भरतीबाबत गृह विभागाकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे.

पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठी बातमी, सरकारची महत्त्वाची घोषणा
पोलीस भरती
Follow us on

राज्यात 17 हजार पोलीस शिपाई भरतीला सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी 31 मार्च ही शेवटची तारीख होती. पण आता राज्य सरकारने या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मुदतवाढ दिली आहे. नव्याने मंजूर झालेल्या मराठा आरक्षणातील SEBC आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब लागत असल्यामुळे सरकारने ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता नव्या आदेशानुसार, उमेदवारांना 15 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत असलेली तारीख वाढवून 15 एप्रिल केली आहे. या मुदतवाढीचा फायदा लाखो उमेदवारांना होऊ शकतो. राज्य सरकारने याबाबत प्रेसनोट जारी करत माहिती दिली आहे.

राज्य सरकारने प्रेसनोटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

“पोलीस भरती २०२३ मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यांत येते की, दिनांक ३१.०३.२०२४ पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत Mahait यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरु आहे. त्याप्रमाणे उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र मिळणेस विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवदेन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक १५.०४.२०२४ करण्यात येत आहे”, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

“अंतिम दिनांकापुर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास, अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेसाठी केलेला अर्जाची पोचपावर्तीसह आवेदन अर्ज सादर करावा. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांचेकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे”, असंही राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

17 हजार 700 पोलिसांची भरती

राज्याच्या गृह विभागाकडून 17 हजार 700 पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीसाठी 5 मार्च 2014 पासून ऑनलाईन अर्ज करता येत आहे. येत्या 30 मार्चपर्यंत ही ऑनलाईन अर्जाची मुदत होती. पण हीच मुदत आता 15 एप्रिल करण्यात आल आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर पोलीस भरतीची माहिती देण्यात आली आहे. या माध्यमातून मुंबईत साडेतीन हडार पोलिसांची भरती केली जाणार आहे. यामध्ये 2 हजार 572 पोलीस शिपाई आणि 917 चालक पदांचा समावेश आहे.