लग्न ठरलं, साखरपुडा झाला, लगीनघाई सुरु होती, अशातच नियतीने घात केला!

| Updated on: Nov 25, 2022 | 8:02 AM

वय अवघं 25 वर्ष! लग्नाच्या तयारीची लगबग होती, घरातला तो एकुलता एक मुलगा, पण...

लग्न ठरलं, साखरपुडा झाला, लगीनघाई सुरु होती, अशातच नियतीने घात केला!
धीरज तट
Image Credit source: Facebook
Follow us on

बीड : घरातल्या एकुलत्या एक तरुण मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड (Beed) जिल्ह्यात घडली. अंबाजोगाई (Ambajogai) येथील 26 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे मुलाच्या आईवडिलांना मोठा धक्का बसलाय. या मुलाचं नाव धीरज तट (Dhiraj Tat) असं आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली. थोड्या दिवसांनी धीरजचा विवाह होणार होता. पण त्याआधीच नियतीनं घात केला. धीरजच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जातेय.

कुटुंबीयांना धक्का

धीरज हा इंजिनिअर होता. अंबाजोगाई इथंच त्यानं इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं होतं. शिक्षण झाल्यानंतर धीरज पुण्यात नोकरी करत होता. याच वर्षी त्याचं लग्नही ठरलं होतं.

25 दिवसांनी त्याचं लग्न होणार होतं. घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरु असताना धीरजचा अकाली मृत्यू त्याच्या कुटुंबीयांच्या काळजाला चटका लावून गेलाय.

पुढच्या महिन्यात लग्न, पण त्याआधीच…

तीन महिन्यांपूर्वी धीरज तट याचं लग्न जमलं होतं. 18 डिसेंबर रोजी धीरजचं लग्न होणार होतं. त्याचा साखरपुडा देखील झाला होता.

घरातल्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली होती. पण बुधवारी सकाळी धीरज तट या तरुणाला हृदयविकाराचा तीव्र धक्क बसला आणि तो जागीच कोसळला.

अकाली मृत्यूने हळहळ

धीरजला त्याचे कुटुंबीय डॉक्टरकडे घेऊन गेले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. एकुलता एक मुलगा ऐन तारुण्यात गमावल्यानं त्याच्या आईवडिलांसह नातलगांना मोठा धक्का बसला. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. धीरज तट या तरुणाच्या मृत्यूमुळे आता हळहळ व्यक्त केली जातेय.

गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला असल्याचं अनेकदा बोललं गेलंय. त्यानंतर आता अंबाजोगाईमध्ये 26 वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकमुळे झालेला मृत्यू पुन्हा एकदा चिंता वाढवणारा ठरलाय. तरुणांमध्ये आहारातील अनियमितता, वाढलेला तणाव, कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण, अपुरी झोप यांसारख्या कारणांमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढल्याचं याआधीही पाहायला मिळालंय.

हार्टअटॅकचा धोका ओळखण्यासाठी वेळोवेळी स्ट्रेस टेस्ट, कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणे, आहार वेळेत घेणे, अशा गोष्टींकडे बारकाईन लक्ष देण्याची गरजही जाणकारांकडून व्यक्त केली जाते.