‘माझ्या भावनांचा कुणी विचार करेल का?’ 6 वर्ष मामाने सांभाळल्यानंतर आता कोर्टाने वडिलांकडे सोपवलं, पण…

| Updated on: Feb 28, 2023 | 7:04 PM

आईच्या निधनानंतर गेली सहा वर्षे मामाकडे राहत असलेल्या मुलाला वडिलांकडे देण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले. मात्र हा निर्णय मुलाला मान्य नव्हता. यामुळे मुलाने कोर्टाबाहेरच रडून गोंधळ घातला.

माझ्या भावनांचा कुणी विचार करेल का? 6 वर्ष मामाने सांभाळल्यानंतर आता कोर्टाने वडिलांकडे सोपवलं, पण...
11 वर्षाच्या मुलाचा मुंबई उच्च न्यायालयाबाहेर रडून गोंधळ
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई / ब्रिजभान जैस्वार : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 11 वर्षीय मुलाचा कोर्टाच्या आवाराबाहेर हंगामा केल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे काही वेळ रस्त्यावर गोंधळ उडाला होता. मुंबई उच्च न्यायालयाने एका 11 वर्षीय मुलाला त्याच्या बायोलॉजीकल पित्याच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला. मात्र मुलगा कोर्टाचा आदेश मानायला तयार नव्हता. मुलाने वडिलांकडे जाण्यास नकार दिला. मात्र वडील त्याला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे मुलाने कोर्टाच्या आवारातच रडारड सुरु केली आणि मुलाच्या वडिलांनाही त्याला आवरण कठिण झालं.

मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती काशिनाथ शिंदे यांच्या न्यायालयाच्या आदेशानंतर 11 वर्षीय मुलाने आपल्या वडिलांसोबत जाण्यास नकार दिला आणि तो रडू लागला. मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेरच्या रस्त्यावर जवळपास 20 मिनिटं मुलाचा गोंधळ सुरु होता. कुणाचेही ऐकण्यास तयार नसल्याने शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्या मुलासहीत सगळ्यांना घेऊन पुन्हा कोर्टात नेलं. मात्र यात कोर्ट काय तोडगा काढणार हा प्रश्नचिन्ह आहे ?

काय आहे प्रकरण?

सदर मुलगा 5 वर्षाचा असताना त्याच्या आईचे कँसरने निधन झाले. तेव्हापासून मुलगा बोरिवली येथे आपल्या मामाकडे राहत होता. त्याचा सर्व खर्च मामाच करत होता. मात्र,मुलाचा ताबा मिळावा यासाठी त्याच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने मुलाला त्याच्या जैविक वडिलांकडे सोपवण्याचे आज आदेश दिले.

हे सुद्धा वाचा

मात्र मुलाला वडिलांकडे जायचे नव्हते, त्याला मामाकडेच रहायचे होते. कोर्टानं लहान मुलालाही कोर्टात बोलावून त्याला कुठे रहायचं आहे हे विचारलं. मुलानंही मामाकडेच हे उत्तर दिलं. मामानेही पित्याला कस्टडी द्यायला कोर्टात जोरदार विरोध केला होता. पण आईविना मुलाच्या योग्य भविष्यासाठी, कायदाच्या आधारावर कोर्टानं मुलाची कस्टडी त्याच्या जन्मदात्या पित्याला सोपविण्याचा आदेश दिला.

कोर्टातून बाहेर येताच चिमुरड्याचा आक्रोश

कोर्टाच्या आदेशानंतर संबंधित सर्वजण कोर्ट आवारातून बाहेर आले. कस्टडी मिळालेल्या पित्यानं चिमुरड्याला कडेवर घेतलं, मात्र मुलगा रडू लागला. मला मामाकडेच जायचं, असा त्यानं तगादाच लावला. हा चिमुरडा इतका आक्रमक झाला की वडील, पोलीस यांनाही त्याला आवरणं मुश्किल झालं. जन्मदात्या पित्यालाही या मुलानं नखांनी जखमी केलं.

मुलाला आवरणं कठिण झाल्याने शेवटी पोलिसांनी मुलासह त्याच्या नातेवाईकांना पुन्हा कोर्टात नेले. आता कोर्ट यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, कायद्यानं घेतलेल्या निर्णयाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो ? याचे प्रत्यय आज मुंबई उच्च न्यायालयासमोर आले.