Ayushi Yadav Murder : आईबाबांनी लग्न स्वीकारावं म्हणून दिलेलं कारणं तिच्या जिवावर उठलं!

| Updated on: Nov 23, 2022 | 2:24 PM

आयुषी यादव हत्याप्रकरणी पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आली महत्त्वाची माहिती! आयुषी नेमकं काय खोटं बोलली होती?

Ayushi Yadav Murder : आईबाबांनी लग्न स्वीकारावं म्हणून दिलेलं कारणं तिच्या जिवावर उठलं!
आयुषी यादव हत्याकांड
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मथुरा इथं यमुना एक्स्प्रेस (Yamuna Express Way) जवळ आढळलेला बॅगमधील मृतदेह होता आयुषी यादव (Ayushi Yadav) या तरुणीचा. 21 वर्षांची आयुषी स्वतःच्या पसंतीने लग्न करुन पुन्हा घरी आली. घरी येऊन तिने आईवडिलांनी आपलं लग्न स्वीकारावं यासाठी, जे कारणं सांगितलं, ते कारणंच तिच्या जीवावर उठलं. दरम्यान, मुलीने सांगितलेलं कारण खोटं असल्याचं तिच्या पोस्टमॉर्टेम (Post Mortem) रिपोर्टमधून समोर आलंय. त्यामुळे आयुषीची हत्या केलेल्या तिच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसलाय.

आईवडिलांनी आपल्या लग्नाला विरोध करु नये, यासाठी आयुषीने एक शक्कल लढवली होती. आपण गरोदर असल्याची थाप तिने आईवडिलांना मारली. हे कारण कळल्यानंतर आईवडील आपल्यासह आपल्या जोडीदारालाही स्वीकारतील, अशी भाबडी आशा आयुषीला होती. पण झालं उलटच!

आयुषीनं गरोदर असल्याचं सांगताच तिच्या वडिलांचा राग आणखीनच भडकला. त्यांनी गोळ्या झाडून पोटच्या पोरीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सुटकेस भरण्यात आरुषीच्या आईने तिच्या वडिलांना मदतही केली होती. यानंतर ही सुटकेस यमुना एक्स्प्रेस वे मार्गावर टाकून देण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी जेव्हा या सुटकेसमध्ये मृतदेह असल्याचं निदर्शनास आलं, त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. वडिलांनीच मुलीची हत्या केली असल्याचं समोर आलं. नितेश यादव यांच्यासह त्याच्या पत्नीला मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटकही केलीय. सध्या ते दोघंही पोलीस कोठडीत आहेत.

नितेश यादव यांनी रागाच्या भरात हे कृत्य केलं असल्याचं म्हटलंय. 17 नोव्हेंबरच्या रात्री आयुषीचं तिच्या आईवडिलांसोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. त्याच रात्री हे हत्याकांड घडलं होतं.

आयुषी यादव या मुलीने तिचा प्रियकर छत्रपाल गुर्जर नावाच्या मुलासोबत आर्य समाज मंदिरात पळून जाऊन लग्न केलं होतं. पण या लग्नाला तिच्या घरातल्यांनी विरोध केला होता. लग्न करुन घरी आल्यानंतर आयुषीने कल्पनाही केली नसेल, अशी घटना घडली. तिच्या जन्मदात्यांनीच तिच्या मृत्यूचा घाट घातला होता.