हेल्थकेअरच्या नावाखाली फ्रॉड! औरंगाबादरांची लाखोंची फसवणूक, नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन

| Updated on: Sep 23, 2021 | 12:29 PM

या फसवणुकीचा पुढील तपास करण्यासाठी ज्या-ज्या नागरिकांनी यात पैसे गुंतवले आहेत, त्यांनी पुढे येण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. जेणेकरून फसवणुकीची व्याप्ती कळू शकेल.

हेल्थकेअरच्या नावाखाली फ्रॉड! औरंगाबादरांची लाखोंची फसवणूक, नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन
हेल्थ केअर पॉलिसीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा
Follow us on

औरंगाबाद: हेल्थकेअर पॉलिसीअंतर्गत (Fraud Health care policy)  दरमहा 350 रुपयांप्रमाणे 20 महिन्यात 7 हजार रुपये भरा आणि 9 वर्षानंतर 14 हजार रुपये घेऊन जा, तसेच या नऊ महिन्यांच्या कालावधीतील सर्व आरोग्यविषयक समस्यांचा खर्च  विनामूल्य करा, अशी योजना घेऊन औरंगाबादमधील ज्योती नगरात फिनॉमिनल हेल्थ केअर कंपनी (Phenomenal health care company) ची स्थापना 2010 मध्ये स्थापन झाली होती. शहरातील अनेक नागरिकांनी यात पैसेही गुंतवलेले आहेत. मात्र आता ही कंपनी बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. कंपनीचे जाळे राज्यभरात पसरलेले असून राज्यातील असंख्य नागरिकांना फसवून कोट्यवधींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

फिनॉमिनल हेल्थ केअर सर्व्हिसचा फ्रॉड

2005 मध्ये फिनॉमिनल हेल्थ केअर सर्व्हिसची स्थापना झाली. औरंगाबादेतही 2010 मध्ये ज्योती नगरमध्ये या कंपनीची शाखा उघडली गेली. विविध हॉटेलमध्ये सेमिनार घेत, लोकांना एकत्र आणत प्रलोभने दाखवली गेली. 9 वर्षे गुंतवणूक करून दुप्पट पैसे घेऊन जा, तसेच मेडिक्लेमचीही सुविधा प्राप्त करा, अशी प्रलोभनं दाखवल्याने अनेकांनी या योजनेला प्रतिसाद दिला. काही दिवस याचा परतावाही दिला. मात्र 2015 नंतर कंपनीने पैसे देणे बंद केले. या प्रकरणी अतुल बाळासाहेब जाधव यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

कंपनीचा अध्य़क्ष नंदलाल केसर सिंग अटकेत

याप्रकरणी फिनॉमिनल हेल्थ केअर सर्व्हिसेस कंपनी लिमिटेडचे चेअरमन नंदलाल केसरसिंग, संचालक थक्केमधाथील, श्रीधरन नायर, सेबेस्टिन मल्लीकल, मीनबहाद्दूर केसरसिंग, कार्यकारी संचालक विलास बाळकृष्ण नायर आणि जोसेफ लाझर (रा. सर्व मुंबई) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होत.ा गुन्ह्यातील मुख्य आरोपी नंदलाल यास लातूर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेने 21 सप्टेंबर रोजी त्याचा ताबा घेतला. दरम्यान आरोपीला 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

तक्रारदाराला फ्रॉड असल्याचे कसे कळाले?

अतुल जाधव यांनी 1 जानेवारी 2005 ते 28 मे 2018 या कालावधीत पैसे भरले. 30 ऑक्टोबर 2015 रोजी त्यांच्या पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे मूळ पॉलिसी व पैसे भरणा पावत्या जमा करून कंपनीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातून जाधव यांच्या नावाने 14 हजार रुपयांचा धनादेश आला.
मात्र तो धनादेश वटलाच नाही. कंपनीच्या औरंगाबादमधील कार्यालयात धाव घेतली असता ते बंद दिसले. अशा प्रकारे कंपनीने शेकडो जणांना फसवून 30 लाख 12 हजार 85 रुपयांना फसवल्याचे उघड झाले आहे.

नागरिकांनी पुढे येऊन तक्रार दाखल करा

दरम्यान, अतुल जाधव यांनी उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर औरंगाबादमध्येही या कंपनीचे जाळे किती फोफावले होते, हे उघड झाले. राज्यभरातही विविध ठिकाणी नंदलाल केसरसिंगविरोधात गुन्हे दाखल आहेत. या फसवणुकीचा पुढील तपास करण्यासाठी ज्या-ज्या नागरिकांनी यात पैसे गुंतवले आहेत, त्यांनी पुढे येण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. जेणेकरून या फसवणुकीची व्याप्ती कळू शकेल, व नागरिकांची पुढे होणारी फसवणूक थांबू शकेल.

इतर बातम्या

भाजीमंडईत थरार घडवणारा टिप्या पोलिसांच्या तावडीतून पुन्हा निसटला, नाशिकमधल्या नातेवाईकांच्या घरावर पोलिसांचा छापा

Aurangabad Crime: मोबाइल दिला नाही म्हणून 12 वर्षाच्या मुलाला आला राग, नाराजीनं घरच सोडलं