मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगली दौऱ्यात गोंधळ, भाजप कार्यकर्त्यांसह 20 जणांवर गुन्हा

| Updated on: Aug 03, 2021 | 1:35 PM

मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांचं निवेदनही स्वीकारलं, पण अचानक भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले आणि जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगली दौऱ्यात गोंधळ, भाजप कार्यकर्त्यांसह 20 जणांवर गुन्हा
सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजप-सेना कार्यकर्त्यांचा गोंधळ
Follow us on

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सांगली दौऱ्यात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांसह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत सोमवारी उद्धव ठाकरे व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेत असतानाच मोठा गोंधळ झाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी अचानक सरकार विरोधात घोषणाबाजी देत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे तिथे जमलेल्या शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला होता.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान सांगलीतील भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या गोंधळाप्रकरणी तब्बल 20 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपच्या 10 कार्यकर्त्यांसह 20 जणांवर संगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सहा अनोळखी माणसं आहेत. मात्र शिवसेना कार्यकर्त्यांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर आणखी नावे निष्पन्न झाली की, ही संख्या वाढणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवार दोन ऑगस्टला सांगली दौऱ्यावर होते. गावागावात जाऊन ते पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत होते, त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत आले. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांचे निवेदनेही स्वीकारले. पण अचानक भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले आणि जोरदार घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केलं.

पोलिसांचा हस्तक्षेप

भाजप कार्यकर्त्यांनी अचानक गोंधळ घातल्याने शिवसैनिकही आक्रमक झाले. त्यांनीही भाजप विरोधात घोषणाबाजी सुरू केल्या. ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘आवाज कुणाचा, शिवसेने’चा अशा घोषणा देत शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी शिवसैनिक पुढे सरसावले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गर्दीतील लोक सैरावैरा धावू लागले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा या परिसरातून निघून गेला. तर पोलिसांनी तात्काळ धाव घेत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री गेल्यानंतरही तब्बल 15 मिनिटं हा गोंधळ सुरूच होता. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर बसून निदर्शने करत होते.

भाजप-सेनेचे दावे-प्रतिदावे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले. त्यांनी आमची निवेदने घेतली नाहीत. त्याआधीच निघून गेले. हा पूरग्रस्तांचा अपमान आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री घरोघरी जावून पूरग्रस्तांचे अश्रू पुसायचे. मात्र, हे मुख्यमंत्री आमचा अपमान करून गेले, असा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. तर भाजपचा हा दावा मात्र शिवसैनिकांनी फेटाळून लावला. मुख्यमंत्री सकाळपासून फिरत आहेत. लोकांच्या व्यथा वेदना जाणून घेत आहेत. सांगलीतील इतर गावातील लोकांनी शांतपणे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली. मात्र, भाजपने निवेदन न देता स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला, असा दावा शिवसेनेने केला आहे.

संबंधित बातम्या:

कोल्हापुरात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटले, सांगलीत मात्र दोघांचे कार्यकर्ते भिडले