42 लेकरांचे खून पचवणाऱ्या रेणुका शिंदे-सीमा गावितचं भवितव्य ठरणार, फाशी टाळण्यासाठी बहिणींचा आटापिटा

| Updated on: Dec 19, 2021 | 3:57 PM

1996 मध्ये कोल्हापुरात 14 लहान मुलांचं अपहरण करुन त्यापैकी पाच जणांची हत्या केल्याप्रकरणी रेणुका शिंदे आणि सीमा गावित या दोघी बहिणींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांची आई अंजना गावितही याच जेलमध्ये होती पण काही वर्षांपूर्वी तिचं जेलमध्येच निधन झालं.

42 लेकरांचे खून पचवणाऱ्या रेणुका शिंदे-सीमा गावितचं भवितव्य ठरणार, फाशी टाळण्यासाठी बहिणींचा आटापिटा
रेणुका शिंदे, अंजना गावित आणि सीमा गावित
Follow us on

मुंबई : जवळपास 42 लेकरांचं अपहरण करुन त्यांची हत्या केल्याप्रकरणी रेणुका शिंदे (Renuka Shinde) आणि सीमा गावित (Seema Gavit) या दोघी बहिणींचं भवितव्य काही दिवसात ठरणार आहे. फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यासाठी गावित बहिणींनी 2014 मध्ये याचिका केली होती. त्यावर शनिवारी सुनावणी पूर्ण झाली. आपल्या दया याचिकेवर ‘अन्यायकारक विलंब’ केल्याचा दावा दोघींनी केला होता. यामुळे आपल्याला प्रचंड मनस्ताप झाला आणि जगण्याच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं, असंही त्यांनी याचिकेत म्हटलं होतं.

1996 मध्ये कोल्हापुरात 42 लहान मुलांचं अपहरण करुन त्यापैकी काही लहानग्यांची हत्या केल्याप्रकरणी रेणुका शिंदे आणि सीमा गावित या दोघी बहिणींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांची आई अंजना गावितही याच जेलमध्ये होती पण काही वर्षांपूर्वी तिचं जेलमध्येच निधन झालं. त्यापैकी केवळ पाच मुलांच्या हत्या प्रकरणात त्या दोषी सिद्ध झाल्या आहेत.

2001 मध्ये दोघींना दोषी ठरवण्यात आलं होतं. 2004 मध्ये हायकोर्टाने त्यांना मृत्युदंड सुनावला, तर 2006 मध्ये सुप्रीम कोर्टानेही त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली. 22 ऑक्टोबर 1996 पासून दोघीही कोठडीत आहेत. गावित बहिणींनी 2014 मध्ये हायकोर्टात याचिका केली होती.

जस्टीस नितीन जामदार आणि जस्टीस सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर शनिवारी अंतिम सुनावणी झाली. गावित बहिणींनी 2006 मध्ये राष्ट्रपतींकडे दया अर्ज केल्याचं यावेळी त्यांचे वकील अनिकेत वगळ यांनी सांगितलं. मात्र, गुन्ह्याची तीव्रता आणि क्रौर्य पाहता त्यांच्या मृत्यूदंडाची शिक्षा कमी करता येणार नाही, असं सांगत सरकारी वकील अरुणा पै यांनी विरोध केला. जर कोर्ट त्यांची शिक्षा कमी करण्याचा विचार करत असेल, तर त्यांना नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

कशी सुरु झाली हत्याकांडाची साखळी?

90 च्या दशकात या घटना घडल्या. अंजना गावित ही मूळची नाशिकची. तिचा जीव एका ट्रक ड्रायव्हरवर जडला. दोघांनी पुण्यात पळून  जाऊन लग्न केलं. त्यांना एक मुलगी झाली, तिचं नाव रेणुका. काही काळाने ट्रक ड्रायव्हरनं अंजना गावितला सोडून दिलं. लहान मोठी कामं करत तिने दिवस ढकलले.

वर्षभराचा काळ गेल्यावर अंजना पुन्हा एका रिटायर्ड सैनिकाच्या प्रेमात पडली. त्यांचं नाव मोहन गावित. अंजनाला दुसरी मुलगी झाली. तिचं नाव सीमा. अंजनाचं मोहन गावितांशीही फार पटलं नाही. मोहन गावितांनीही अंजनाला सोडून दिलं. त्यामुळे पदरात दोन मुलींसह ती दुसऱ्यांदा रस्त्यावर आली.

आणि अंजनानं चोरी सुरु केली

आपलं आणि आपल्या दोन्ही मुलींचं पोट कसं भरायचं असा मोठा प्रश्न अंजनाबाईसमोर उभा राहिला. तिनं चोरीचा मार्ग पत्करला. छोट्या मोठ्या चोऱ्या करायला लागली. कधी कुणाचं पाकीट मार तर कधी कुणाची बॅग लंपास कर. दोन्ही मुली हळूहळू मोठ्या झाल्या तसं अंजनानं त्यांनाही चोरी चपाट्या करायला शिकवलं. तिघी मिळून मग लोकांच्या पैशावर डल्ले मारायला लागल्या.

आणि लेकरांची कसाई झाली

चोरी केली, त्यातून सुटका करण्यासाठी एका लेकराची ढाल बनवली, त्याला संपवलं आणि चोरी सुकर झाली. अंजना गावितला चोरी करता करता पकडलं गेलं तर त्यातून सुटका करुन घेण्यासाठी मार्ग सापडला. मायलेकींनी मग चोरी करायला निघताना झोपडपट्टीत, रस्त्यावर चक्कर मारायच्या. एखाद्या लहान लेकराला हेरायच्या. शक्यतो ते झोपडपट्टीतलेच असायचे. कारण त्यांचं अपह्रण करणं सोप्पं असायचं. त्यांच्यावर फार कुणाची पाळत नसायची. पोलीसात तक्रार होण्याची शक्यताही कमी असायची. लेकराला उचलायच्या, चोरी करायच्या, पकडलं गेलं की लेकराला जमीनीवर आपटायच्या. स्वत:ची सुटका करुन घ्यायचं. नंतर त्या जखमी लेकरालाही कायमचं संपवून टाकायच्या. हे सगळं उघडं पडेपर्यंत चालत राहीलं.

संबंधित बातम्या :

जेव्हा महाराष्ट्रात तीन मायलेकींनी 42 लेकरांची हत्या केली, एक एक हत्या थरकाप उडवणारी