स्वस्त दरात फ्लॅट उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन फसवणूक, ‘असा’ झाला टोळीचा पर्दाफाश

विरार पश्चिम बोळिंज येथील जून 2021 ते मार्च 2022 या कालावधीत बँकेने लिलावात काढलेली मालमत्ता/घरे, एनपीए तत्वावर स्वस्तात तडजोडी अंती विकण्याचे अमिष दाखवले.

स्वस्त दरात फ्लॅट उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन फसवणूक, असा झाला टोळीचा पर्दाफाश
स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणारे अटक
Image Credit source: TV9
| Updated on: Feb 16, 2023 | 8:48 AM

विरार / विजय गायकवाड (प्रतिनिधी) : वेगवेगळ्या बोगस कंपनी स्थापन करून बँक लिलावातील फ्लॅट स्वस्त दरात उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन सर्वसामान्य माणसांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा विरारमध्ये भांडाफोड झाला आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीतील 4 आरोपींना विरार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी वसई, विरार, नालासोपारा, ठाणे, मुंबई परिसरातील 157 नागरिकांची 3 कोटी 75 लाखांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विरार गुन्हे शाखा कक्ष 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने ही कामगिरी केली. अटक आरोपींविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाणे विरार, बृहन्मुंबई आझाद मैदान आणि ठाणे शहरातील चितळसार, मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमन्वये गुन्हे दाखल आहेत.

परवेझ दस्तगिर शेख उर्फ राहुल भट उर्फ पीटर सिक्वेरा उर्फ असिफ सय्यद, साहेब हुसेन शेख उर्फ नितीन शर्मा उर्फ प्रशांत बन्सल उर्फ सोहेल शेख, प्रविण मल्हारी ननावरे, हिना इकबाल चुडेसरा उर्फ हिना सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. हे आरोपी मीरा रोड, भाईंदर, ठाणे, कळवा, खारागाव, काशीमीरा या परिसरातील राहणारे आहेत.

लिलावातील घरे स्वस्त दरात विकण्याचे आमिष दाखवून फसवणूक

विरार पश्चिम बोळिंज येथील जून 2021 ते मार्च 2022 या कालावधीत बँकेने लिलावात काढलेली मालमत्ता/घरे, एनपीए तत्वावर स्वस्तात तडजोडी अंती विकण्याचे अमिष दाखवले. नागरिकांचा विश्वास संपादन करून विनर्स या कंपनीच्या नावाने 44 नागरिकांची 80 लाखाला फसवणूक केली.

याप्रकरणी 56 वर्षीय पियुषकुमार दिवाण यांच्या तक्रारीवरून 28 मार्च 2022 रोजी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 406, 465, 467, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितासबंधाचे रक्षण अधिनियम 1999 चे कलम 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

विरार गुन्हे शाखेने केला पर्दाफाश

अशाच प्रकारे मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय, ठाणे, मुंबई परिसरात ही गुन्हे दाखल झाले होते. गुन्ह्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन विरार गुन्हे शाखा कक्ष 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची फसवणूक थांबविण्यासाठी स्वतंत्र पथकाने काम करून या टोळीचा भांडाफोड करण्यात यश मिळविले आहे.

या टोळीने लँड लॅडर नावाची कंपनी स्थापन करून, जी बी रोड कापूरबावडी ठाणे येथील 40 नागरिकांची 1 कोटी 20 लाख आणि पाटील डिजिटल कंपनी स्थापन करून आझाद मैदान मुंबई येथील 72 नागरिकांची 1 कोटी 75 लाखांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

Follow Us