Ahmednagar Crime : कौटुंबिक वाद टोकाला गेला, पतीने पत्नी आणि सासूचा झोपेतच काटा काढला !

| Updated on: Aug 16, 2023 | 12:10 PM

नेहमीप्रमाणे रात्री सर्वजण जेवून झोपले होते. सकाळी दिर उठला आणि रुममध्ये पाहतो तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. घटना उघड होताच गावातही एकच खळबळ माजली.

Ahmednagar Crime : कौटुंबिक वाद टोकाला गेला, पतीने पत्नी आणि सासूचा झोपेतच काटा काढला !
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर / 16 ऑगस्ट 2023 : अहमदनगरमध्ये हत्येचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. गेल्या काही दिवसात हत्येच्या घटना वाढल्या असतानाच आज पुन्हा नगरमध्ये दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची घटना अहमदनगरमधील राहुरी तालुक्यात घडली आहे. मध्यरात्री झोपेत असताना डोक्यात लोखंडी पहार घालून हत्या केली. या घटनेमुळे राहुरी तालुक्यातील कात्रड गावात एकच खळबळ उडाली आहे. नूतन सागर साबळे आणि सासू सुरेखा दिलीप दांगट अशी मयत माय-लेकींची नावे आहेत. हत्येनंतर आरोपी पती फरार झाला आहे. सागर सुरेश साबळे असे फरार आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळी दिर आल्यानंतर घटना उघड

सागर साबळे याचा पत्नी आणि सासूसोबत काही कारणातून वाद होता. वाद विकोपाला गेला. याच रागातून सागरने मध्यरात्री झोपेत असताना सासू आणि पत्नीच्या डोक्यात लोखंडी पहार घालून त्यांची हत्या केली. हत्येनंतर सागर पळून गेला. सकाळी सागरचा भाऊ उठला तर वहिनी आणि तिची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्याने राहुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले असून, आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीत नेमका काय वाद होता, याचाही पोलीस तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा