आठ वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम, सुखी संसाराचे स्वप्नही पाहिले, पण…

| Updated on: May 08, 2023 | 7:01 PM

गेल्या आठ वर्षापासून दोघांचे प्रेमसंबंध सुरु होते. एकमेकांसोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. मात्र अचानक जे घडले त्याने सर्वत्र हादरले. कुणी कल्पनाही केली नसेल प्रेमाचा इतका भयंकर अंत होईल.

आठ वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम, सुखी संसाराचे स्वप्नही पाहिले, पण...
Heartbreak
Follow us on

छोटा उदयपूर : गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटना उघड होताच शहरात एकच खळबळ उडाली. कालव्यात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यास आणि हत्येचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. प्रियकर लग्नाला टाळाटाळ करत होता म्हणून प्रेयसीनेच दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढला. पोलिसांनी प्रेयसीसह तिच्या मित्राला अटक केली आहे. निलेश इशाक असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. श्रेयस उर्फ ​​अप्पू सोनी आणि जया राठवा अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे निलेशही आधीच विवाहित होता आणि आरोपी अप्पू सोनी हा देखील विवाहित आहे.

अचानक तरुण बेपत्ता झाला

नीलेश इशाक याच्या भावाने स्थानिक पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तरुणाचा शोध सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना निलेशचा मृतदेह पावीजेतपूर येथील रायपूर कालव्यात आढळला. मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केला. निलेशच्या नातेवाईकांची चौकशी केली असता श्रेयस उर्फ ​​अप्पू सोनी आणि जया राठवा हे जवळच्या गावातील रहिवासी वारंवार त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे त्यांनी सांगितले.

लग्नाला टाळाटाळ करत होता म्हणून संपवले

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जया राठवा आणि अप्पु सोनी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला दोघेही उडवाउडवीची उत्तरे देत होते. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. जया राठवाचे नीलेशसोबत 8 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र निलेश लग्नासाठी टाळाटाळ होता. यादरम्यान तिची भेट श्रेयस उर्फ ​​अप्पू सोनी याच्याशी झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. मग दोघांनी नीलेशला मार्गातून दूर करण्याचा प्लॅन केला.

हे सुद्धा वाचा

जयाने नीलेशला भेटण्यासाठी बोलावले आणि गाडीत बसून त्याच्याशी मारत होती. संधी पाहून अप्पू सोनी आणि जयाने गाडीत त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पाविजेतपूरजवळील रायपूर कालव्यात फेकून दिला. त्यानंतर ती मुंबईला गेली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.