पालघर : पालघरमध्ये पुन्हा एकदा साधू हत्याकांडाची घटना होता होता टळली. वाणगाव हद्दीत भिक्षा मागायला आलेल्या दोन साधूंना नागरिकांनी घेराव घातला. मात्र पोलीस वेळीच दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी जमावाची समजूत काढून साधूंची सुटका केली. साधू चोर असल्याची अफवा पसरल्याने जमावाने त्यांना घेराव घातला. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि वाणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप काहले यांनी केलं आहे.
पालघरमधील वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंद्रनगर भागात दोन साधू भिक्षा मागण्यासाठी आले होते. मात्र हे साधू चोर असल्याच्या अफवा पसरली. यानंतर या दोन्ही साधूंना परिसरातील काही नागरिकांनी घेराव घातला. याची माहिती मिळताच तातडीने वाणगाव पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमलेल्या जमावाची समजूत काढली. तसंच या दोन्ही साधूंची घटनास्थळावरून सुखरूप सुटका केली.
पालघर जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या गडचिंचले येथील साधू हत्याकांडानंतर पोलीस प्रशासनाने जनसंवाद अभियान सुरू केलं आहे. या अभियानांतर्गत गावागावात जाऊन पालघर पोलीस प्रशासनामार्फत जनजागृती करण्यात येते. याच अभियानामुळे चंदननगर येथे घडलेल्या या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.
पालघरमध्ये याआधी सप्टेंबर 2022 मध्ये वाडा पोलिसांनी एका साधूची सुटका केली होती. मुलं चोरणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा पसरली होती. याच संशयातून लोकांनी साधूला घेराव घातला होता. मात्र एका जागरूक नागरिकाने त्वरित पोलिसांना संपर्क केला. वाडा पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. जमावाने घेराव घातलेल्या साधूची पोलिसांनी सुखरूप सुटका केली.