पाच महिन्यांपूर्वीच लग्न, संसार नीट सुरुही झाला नाही तितक्यात त्याने सर्व संपवलं, कारण काय?

मंगळवारची पहाट एक धक्कदायक बातमी घेऊन उगवली. घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ माजली. असं काय घडलं की त्याला नात्यांचाच विसर पडावा.

पाच महिन्यांपूर्वीच लग्न, संसार नीट सुरुही झाला नाही तितक्यात त्याने सर्व संपवलं, कारण काय?
रेल्वे कर्मचाऱ्याकडून आई आणि पत्नीची हत्या
Image Credit source: TV9
| Updated on: May 23, 2023 | 12:37 PM

जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्याने आपली आई आणि पत्नीची निर्घृण हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. भुसावळ शहरातील वांजोळा रोडवर असलेल्या बालाजी लॉन मागील शगुन इस्टेटमध्ये मंगळवारी पहाटे ही घटना घडली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आराध्या हेमंत भूषण आणि सुशिला देवी भूषण अशी मयत सासू-सुनेची नावं आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी हेमंत श्रवण भूषण याला ताब्यात घेतलं आहे. हेमंत हा रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे.

कौटुंबिक वादातून दुहेरी हत्या

घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तसेच जखमी मेव्हण्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात सखोल चौकशी करत आहेत. हत्येमागे नेमके काय कारण होते, हे तपासाअंतीच कळेल.

आरोपीचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता

हेमंत आणि आराध्या यांचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. आरोपी पत्नी, आई आणि मेव्हण्यासह भुसावळ शहरातील वांजोळा रोडवर राहत होता. घरामध्ये कौटुंबिक वाद होते. या वादाला कंटाळून आरोपीने आई आणि पत्नीची हत्या केली. तसेच मेव्हण्याला जखमी केले. मेव्हण्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नागपूरमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

हिंगणा एमआयडीसी परिसरात 30 ते 35 वर्ष वयाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. चंदन शाह या व्यक्तीचा हा मृतदेह असल्याचा पोलीस तपासात पुढे आला आहे. चंदन शहा हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर 30 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतदेहावर काही जखमा दिसत असल्याने हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू आहे.