VIDEO | तू आमच्या गटात का येत नाहीस? ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याच्या घरावर टोळक्याने हल्ला

| Updated on: Sep 17, 2021 | 12:17 PM

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या काही जणांनाही मारहाण झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहेत. ही घटना ग्रामपंचायतीच्या वादातून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

VIDEO | तू आमच्या गटात का येत नाहीस? ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याच्या घरावर टोळक्याने हल्ला
हिंगोलीत ग्रामपंचायतीच्या राजकारणातून राडा
Follow us on

हिंगोली : “तू आमच्या गटात का येत नाहीस?” असं विचारत ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याच्या घरावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणांनी आपल्याशी छेडछाड करत मारहाण केल्याचा आरोप ज्योती पवार यांनी केला आहे. हिंगोली तालुक्यातील खरबी येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नेमकं काय घडलं?

“तू आमच्या गटात का येत नाहीस?” अशी विचारणा केल्यानंतर झालेल्या तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ग्रामपंचायत सदस्या ज्योती पवार यांच्या घरावर टोळक्याने हल्ला केला. त्यानंतर काही तरुणांनी आपल्यासोबत छेडछाड करत मारहाण केल्याचा आरोपही ज्योती पवार यांनी केला आहे.

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या काही जणांनाही मारहाण झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहेत. ही घटना ग्रामपंचायतीच्या वादातून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

17 जणांवर गुन्हा, तिघे जण गंभीर जखमी

यामध्ये परस्पर विरोधी असे एकूण 17 जणांवर हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर हिंगोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून गावात तणाव पूर्ण शांतता असल्याचं पोलिसांनी सागितलं.

पाहा व्हिडीओ :

औरंगाबादमध्ये शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण

याआधी, शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली होती. पुरुषांसह महिलांनाही चोप देण्यात आला होता. बांधाच्या वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती समोर आली होती. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

औरंगाबादेतील गुंडगिरीची आणखी एक घटना

दुसरीकडे, औरंगाबादेतील गुंडगिरीची आणखी एक घटना नुकतीच समोर आली होती. गेटसमोर थांबू नका, असं सांगितल्याच्या रागातून टोळक्याने तोडफोड केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे औरंगाबादमधील उद्योजगांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे. गेटसमोर थांबू नका, असं सांगितल्याच्या रागातून टोळक्याने कंपनी परिसरात तोडफोड केली. आकार टूल्स कंपनीच्या केबिनची टोळक्याने तोडफोड केल्याचं समोर आलं होतं. तोडफोड करणाऱ्या सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

VIDEO | शेतीच्या वादातून राडा, दोन गटात तुफान हाणामारी, लाठ्या-काठ्यांसह दगड-विटांनी मारहाण

औरंगाबादमध्ये जमिनीचा वाद, होमगार्ड महिलेला नग्न करुन मारहाण