नागज घाटात अपघात नाही, तर हत्या; चार महिन्यांनी कोडं सुटलं, गुप्तधन न शोधल्याच्या रागातून खून

| Updated on: Feb 08, 2022 | 10:23 AM

17 ऑक्टोबर 2021 रोजी नागज घाटात विटा-जत रस्त्यापासून सुमारे दहा फूट खाली अवधूत शिंदेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. अवधूतच्या मृतदेहाजवळ बाईक पडलेली असल्याने हा अपघात असावा, असा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जात होता.

नागज घाटात अपघात नाही, तर हत्या; चार महिन्यांनी कोडं सुटलं, गुप्तधन न शोधल्याच्या रागातून खून
सांगलीतील तरुणाच्या मृत्यूचं गूढ चार महिन्यांनी उकललं
Follow us on

सांगली : सोने आणि पैसे घेऊनही गुप्तधन शोधले नाही म्हणून युवकाची हत्या (Youth Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चार महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज घाटात तरुण मृतावस्थेत आढळला होता. बाईक अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याचं भासवण्यात आलं होतं, मात्र अखेर त्याच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. अवधूत सोपान शिंदे असं 29 वर्षीय मयत तरुणाचं नाव आहे. तो सांगली (Sangli Crime) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील धामणी येथील रहिवासी होता. अवधूतचा खूनच झाल्याचे पोलिस तपासादरम्यान स्पष्ट झाले. पैसे घेऊनही गुप्तधन शोधले नाही म्हणून आरोपींनी त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी सहा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

17 ऑक्टोबर 2021 रोजी नागज घाटात विटा-जत रस्त्यापासून सुमारे दहा फूट खाली अवधूत शिंदेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. अवधूतच्या मृतदेहाजवळ बाईक पडलेली असल्याने हा अपघात असावा, असा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त केला जात होता.

आनंदराव आत्माराम पाटील (वय 57 वर्ष, रा. पाडळी, ता. तासगाव), तुषार बाळू कुंभार (वय 28 वर्ष, रा. घोटी खुर्द, ता. तासगाव), लखन ठोंबरे (रा. पंचशीलनगर, विटा), वैभव नेताजी सकट, अमोल विठ्ठल कारंडे (दोघेही रा. आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा) आणखी एका जणाविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी आनंदराव पाटील, तुषार कुंभार आणि अमोल कारंडे या तिघांना अटक करुन पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

हत्येचं कारण काय?

गुप्तधन शोधण्यासाठी आनंदराव आणि इतरांकडून अवधूतने पैसे आणि सोने घेतल्याचा दावा केला जातो. परंतु गुप्तधन तर शोधले नाहीच, पण घेतलेले पैसेही परत देत नसल्याच्या कारणावरुन त्याचा खून केला असल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

आनंदराव पाटील, तुषार कुंभार, लखन ठोंबरे, वैभव सकट, अमोल कारंडे आणि सहाव्या आरोपीने आठ ऑक्टोबरला रात्री अवधूतला खटाव तालुक्यातील आंबवडे गावातील माळावर नेले. तिथे काठ्या आणि लोखंडी पाईपने मारहाण करुन त्याचा जीव घेतला. त्यानंतर कारमधून त्याचा मृतदेह नागज घाटात आणून टाकला. अवधूतची हत्या नसून अपघात झाल्याचा बनाव रचण्यासाठी आरोपींनी त्याच्या मृतदेहाजवळ मोबाईल आणि बाईक टाकली होती.

कवठेमहांकाळ पोलिसांनी चार महिन्यांनी या खुनाचा छडा लावला. तिघा संशयितांना अटक केली असून अन्य तीन संशयितांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार, शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

दरवाजा आतून बंद, सुप्रसिद्ध गायिका राहत्या घरी मृतावस्थेत, सरिता चौधरींची हत्या की आत्महत्या?

दहा रुपयांच्या सिगारेटवरुन वाद, टोळक्याचा दुकानावर हल्ला, दुकानदाराच्या वडिलांची हत्या

बाबा, तुम्ही आई आणि धाकट्या बहिणीला का मारलंत? 89 वर्षीय निवृत्त लष्करी जवानाने घडाघडा कारणं सांगितली