एकेकाळचा सख्खा मित्रच ठरला पक्का वैरी, टोळक्याकडून गुंडाची भर रस्त्यात दिवसाढवळ्या हत्या, उल्हासनगरात भयानक थरार

| Updated on: Sep 17, 2021 | 11:07 PM

उल्हासनगरात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराची दिवसाढवळ्या भररस्त्यात धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या करण्यात आलीय. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या 2 तासात पाचही मारेकऱ्यांना बेड्या ठोकत गजाआड केलं आहे.

एकेकाळचा सख्खा मित्रच ठरला पक्का वैरी, टोळक्याकडून गुंडाची भर रस्त्यात दिवसाढवळ्या हत्या, उल्हासनगरात भयानक थरार
चाकू, कोयता आणि रॉडने जीवघेणा हल्ला, पाच-सहा जणांनी मिळून धारातीर्थ पाडलं, कुख्यात गुंडाचा तडफडून मृत्यू
Follow us on

उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगरात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराची दिवसाढवळ्या भररस्त्यात धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या करण्यात आलीय. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या 2 तासात पाचही मारेकऱ्यांना बेड्या ठोकत गजाआड केलं आहे. सुशांत गायकवाड उर्फ गुड्या असं हत्या करण्यात आलेल्या गुंडाचं नाव आहे. सुशांत हा शुक्रवारी (17 सप्टेंबर) दुपारी 2 वाजेच्या सुमारास उल्हासनगरच्या नेताजी चौकात काही मित्रांसह उभा होता. यावेळी तिथे आलेल्या एका टोळक्यानं त्याच्यावर चाकू, कोयता आणि रॉडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सुशांत हा काही काळ रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडला होता.

पोलीस घटनास्थळी दाखल, सुशांतचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मारेकऱ्यांचा शोध सुरु केला.

पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?

सुशांत याचा पूर्वीचा मित्र आणि त्याच्यासोबत 3 गुन्ह्यांमध्ये सहआरोपी असलेल्या आकाश शिंदे उर्फ चिंट्या याच्याशी सुशांत याचे काही दिवसांपासून वाद सुरु होते. त्यातच शुक्रवारी सकाळच्या सुमारास आकाश शिंदे याच्या आईने सुशांतच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती. त्यामुळे आकाश याचा शोध घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपणच ही हत्या केल्याची कबुली दिली.

पोलिसांकडून आणखी चार जणांना अटक

आरोपी आकाशने आपला गुन्हा कबूल केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 2 तासात अमोल मोरे उर्फ वांग्या, आकाश खडसे, यश रुपवते आणि अवी थोरात या आणखी 4 मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या. या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या सुशांत याच्यावर 7 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुशांत याच्या एका मित्राची यापूर्वी अंबरनाथमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यामुळे उल्हासनगरात यानिमित्तानं पुन्हा एकदा गँगवॉर सुरु झालंय का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

कल्याणमध्ये दारु न दिल्याने तरुणाची हत्या

दुसरीकडे कल्याणमध्ये देखील हत्येची एक घटना समोर आली आहे. दारु न दिल्याने दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी दोघा आरोपीना गजाआड केलं आहे. सुनील चौधरी, लुटो महलहार अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघा आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दारु न दिल्याने झालेल्या हत्येच्या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.