#क्राईम_किस्से : रात्र वैऱ्याची, सहा वर्षात 42 हत्या, निराधार, गरिबांना टार्गेट करणारा रमण राघवचे भयानक कृत्य, तरीही फाशीची शिक्षा नाही कारण…

| Updated on: Aug 24, 2021 | 8:36 AM

1965-66 सालाची गोष्ट ! मुंबईत फुटपाथवर किंवा झोपडपट्ट्यांमध्ये झोपलेल्या रहिवाशांची मध्यरात्री डोक्यात धारदार शस्त्राने हत्या करण्यात येत होत्या. सर्व खून रात्रीच्या अंधारात केले जात होते.

#क्राईम_किस्से : रात्र वैऱ्याची, सहा वर्षात 42 हत्या, निराधार, गरिबांना टार्गेट करणारा रमण राघवचे भयानक कृत्य, तरीही फाशीची शिक्षा नाही कारण...
फोटोत मध्यभागी दिसणारा रमण राघव
Follow us on

मुंबई : काही लोक विक्षिप्त आणि विचित्र असतात. त्यांच्या विक्षिप्त असण्यामागे बरेच कारणं असतात. पण कुणी विक्षिप्त असल्याने निष्पाप लोकांच्या हत्या करेल, असं तुम्हाला सांगितलं तर तुमची प्रतिक्रिया नेमकी काय असेल? कदाचित तुम्हाला आश्चर्य किंवा वाईट वाटेल. काही जणांना विश्वासही बसणार नाही. पण होय, मुंबईत अशा काही घटना याआधी घडल्या आहेत. या घटनांच्या क्रेंदबिंदू होता तो रमण राघव ! खरंतर रमण राघव याची अनेक नावं होती. म्हणजे तो कधी सिंधी तलवाई किंवा दलवाई या नावाने वावरायचा. तर कधी तो तंबी, आण्णा, वेलूस्वामी अशी नावं सांगून लोकांना गंडवायचा. परिस्थितीनुरुप तो नावं बदलायचा. पण तो मुळात मनोरुग्णच होता.

नेमकं प्रकरण काय?

1965-66 सालाची गोष्ट ! मुंबईत फुटपाथवर किंवा झोपडपट्ट्यांमध्ये झोपलेल्या रहिवाशांची मध्यरात्री डोक्यात धारदार शस्त्राने हत्या करण्यात येत होत्या. सर्व खून रात्रीच्या अंधारात केले जात होते. त्यावेळी एकाच वर्षात तब्बल 19 जणांवर रात्रीच्या वेळी धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला होता. या हत्येच्या घटनांनी संपूर्ण मुंबई हादरली होती. हत्या करणारा नेमका कोण आहे? तो हत्या का करतोय? याची काहीच माहिती मिळत नव्हती. विशेष म्हणजे पोलीस देखील हतबल झाले होते. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली. सामान्य नागरिकांनी जागते रहोचा नारा देत खूनीला पकडण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. पण आरोपी सापडतच नव्हता.

1968 मध्ये हत्येच्या घटना वाढल्या

1966 नंतर हे प्रकरण थोडं शांत झालं. पण 1968 मध्ये पुन्हा खुनांच्या घटनांनी डोकंवर काढलं. या काळात तर भुताटकीच्या अफवांना देखील उत आला. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरुच होता. पण आरोपीला पकडण्यात यश मिळत नव्हतं. त्यावेळी तत्कालीन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतले. शहरात मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन सुरु केलं. याद्वारे संशयितांना पोलीस अटक करत होते. यावेळी रमण राघवला देखील पकडण्यात आलं. पण त्याच्या विरोधात ठोस पुरावा न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आलं होतं. रमण याने हल्ला केलेल्यांपैकी एका महिलेचा जीव वाचला होता. तिने त्याला बघितलं होतं. तिने सांगितलेल्या माहितीनुसार त्याचं स्केच बनवण्यात आलं होतं. याच स्केचच्या आधारावरप पीएसआय एलेक्स फियालो यांनी रमणला पकडलं.

अखेर 42 हत्यांची कबुली

पोलिसांनी दुसऱ्यांदा जेव्हा त्याच्या मुसक्या आवळल्या तेव्हा रमनने आपला गुन्हा कबूल केला. विशेष म्हणजे सुरुवातीला पोलिसांनी पकडलं तेव्हा तो काहीच बोलेना. पण पोलिसांनी त्याच्या परिने घेत त्याच्याकडून माहिती घेतली. विशेष म्हणजे पोलिसांनी सुरुवातीचे दोन दिवस आरोपीला चिकन खाऊ घातलं होतं. अखेर तिसऱ्या दिवशी रमन याने हत्यारं कुठे लपवली होती त्या घटनास्थळी पोलिसांना नेलं. त्यानंतर त्याने 42 हत्याच्या घटवा कबूल केल्या. पण त्याने त्यापेक्षा जास्त खून केल्याचा दावा केला जातो.

आधी फाशीची शिक्षा, नंतर जन्मठेपात रुपांतर

आरोपीला कोर्टाने सुरुवातीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण त्याच्या विक्षिप्त वागण्यावरुन पुढे त्याची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली होती. त्याऐवजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्यावर येरवडा तुरुंगात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड रिसर्चमध्ये उपचार सुरु होते. अखेर 1995 मध्ये पुण्याच्या ससून रुग्णालयात किडनीच्या विकाराने त्याचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा :

अंडरवर्ल्डकडून गुलशन कुमारांची निर्घृण हत्या, बॉलिवूडची भळभळती जखम, गुन्हेगार अनेक, शिक्षा एकालाच

छोटा राजनचा ‘चिंधी’ असा उल्लेख, भडकलेल्या माफिया डॉनकडून पत्रकार जे. डे यांची भर दिवसा हत्या, मुंबईत एकच खळबळ

पेशाने डॉक्टर, पण गैरकृत्यांची परिसीमा, 40 पेक्षाही जास्त टॅक्सी चालकांना मारुन मगरांना मृतदेह खाऊ घालणारा सीरिअल किलर