Cyrus Mystry Accident : सायरस मिस्त्री अपघात प्रकरण, डॉ. अनाहिता पंडोले यांना हायकोर्टाचा दिलासा

| Updated on: Jan 17, 2023 | 8:29 PM

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉ. अनाहिता पंडोले यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्यांनी दारूच्या नशेत कार चालवली म्हणून अपघात घडला, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

Cyrus Mystry Accident : सायरस मिस्त्री अपघात प्रकरण, डॉ. अनाहिता पंडोले यांना हायकोर्टाचा दिलासा
सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी अनाहिता पंडोले यांना दिलासा
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात डॉ. अनाहिता पंडोले यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आज उच्च न्यायालयाने आर्थिक दंड ठोठावत ही याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्याचा कोणताही संबंध नसताना अशाप्रकारे याचिका दाखल करणे हे चुकीचे आहे. याचिकेत कोणतेही तथ्य नाही. केवळ प्रसिद्धीसाठी ही याचिका दाखल केली आहे. ही ‘पब्लिसिटी इंटरेस्ट लिटीगेशन’ वाटतेय, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे याचिकाकर्ते पालघरचे स्थानिक रहिवासी संदेश जेधे यांना मोठा झटका बसला, तर डॉ. अनाहिता पंडोले यांना दिलासा मिळाला आहे. जेधे यांची याचिका सुनावणीस योग्य नाही, असा निर्वाळाही न्यायालयाने दिला.

अनाहिता यांनी नशेत कार चालवल्याचा केला होता आरोप

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉ. अनाहिता पंडोले यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्यांनी दारूच्या नशेत कार चालवली म्हणून अपघात घडला, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

या अपघात प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र अनाहिता यांच्या वतीने त्या नशेत नव्हत्या, याचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सादर करण्यात आला. त्याची खंडपीठाने गंभीर दखल घेतली आणि याचिकाकर्त्यालाच ठोस पुरावा नसताना आरोप कसा केला, असा सवाल केला.

हे सुद्धा वाचा

न्यायालयात पुरावे सादर करण्यात अपयश

मंगळवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. सदर याचिकेतील मागण्यांकरता दंडाधिकारी न्यायालयात दाद का मागितली नाही तसेच याचिका करण्यामागील उद्देश काय, असा प्रश्न देखील खंडपीठाने याचिकाकर्ता जेधे यांना मागील सुनावणीदरम्यान विचारला होता.

तसेच स्वतःजवळ असलेले सर्व पुरावे सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते. मात्र याचिकाकर्त्याला पुरावे सादर करण्यात अपयश आले. यावेळी सरकारी वकिलांनी सर्व आरोप फेटाळले. तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा सरकारी वकिलांनी आजच्या सुनावणीदरम्यान केला.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आम्ही आमची पुढची कायदेशीर भूमिका काय असणार आहे, यावर लवकरच निर्णय घेऊ असे वकील विकार राजगुरू यांनी सांगितले.