Video : चिखलामुळे अंदाज चुकला! खड्ड्यात आदळला आणि टेम्पो रस्त्यावरच धप्पाक्…

Ulhasnagar : रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी प्रश्न उल्हासनगरमधील रस्त्याबाबत विचारला जातोय. जीवघेण्या खड्ड्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने कधी पाहिलं जाणार? अजून किती जीव गेल्यानंतर, अपघात घडल्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांबाबत ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत?

Video : चिखलामुळे अंदाज चुकला! खड्ड्यात आदळला आणि टेम्पो रस्त्यावरच धप्पाक्...
खड्ड्यामुळे टेम्पो पलटी
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 20, 2022 | 7:21 AM

उल्हासनगर : एकीकडे ठाणे आणि कल्याण भागात खड्ड्यांमुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मात्र तरिही खड्ड्यांकडे (Pothole) प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय. उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar road) रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात आता वाहनं उलटू लागली आहेत. अशाच एका जीवघेण्या खड्ड्यात एक टेम्पो पलटी झाला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात चिखल साचला होता. खड्ड्याची खोली चालकाच्या लक्षात आली नाही. टेम्पोचं पुढचं चाक खड्ड्यात आदळल्यानंतर टेम्पो (Tempo Accident News) रस्त्यावरच आडवा झाला. रस्त्यात टेम्पो पलटी झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला.

उल्हासनगरच्या नेताजी चौक या प्रमुख चौकाला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत. या खड्ड्यांमधून प्रवास करताना सोमवारी सकाळी एक मालवाहू टेम्पो अडकला. खड्ड्यात टेम्पोचं पुढचं चाक गेल्यानंतर टेम्पोचा बॅलन्स बिघडला आणि टेम्पो थेट उलटलाच.

पलटी झालेल्या या टेम्पोत कपडे भरून नेले जात होते. सुदैवानं या टेम्पोचा चालक अगदी थोडक्यात वाचलाय. टेम्पो पलटी झाला असला तरी, चालकाला फारशी इजा नाही नाही. मात्र टेम्पोचं काही प्रमाणात नुकसान झालं.

पाहा व्हिडीओ :

या घटनेनंतर स्थानिकांनी टेम्पो रिकामा केला. रस्त्यावर असलेल्या काही सजग नागरिकांनी टेम्पो पुन्हा उभा करण्यासाठी मदत केली आणि टेम्पो चालकाला बाहेर काढलं. उल्हासनगरमधील घटनेमुळे खड्ड्यांबाबत नाराजी व्यक्त होत असून महापालिकेनं याकडे लक्ष देण्याची मागणी होतेय.

दरवर्षी पावसात रस्त्याची चाळण होणं, खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होणं, निष्पापांचा बळी जाणं, हे यावर्षीही सुरुच असल्याचं पाहायला मिळालंय. तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजवलेही जातात. मात्र मुसळधार पावसाने पुन्हा रस्त्यांची अवस्था खड्डेमय होते. यावर कायमस्वरुपी उपाय केव्हा केला जाणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय.