बहिणीला सासरी सोडायला आलेला भाऊ जिवंत घरी परतलाच नाही! वाटेत काय घडलं?

| Updated on: Nov 09, 2022 | 9:53 AM

नाशिक हादरलं! देवळाली कॅम्प-भगूर रस्त्यावरील धक्कादायक घटना

बहिणीला सासरी सोडायला आलेला भाऊ जिवंत घरी परतलाच नाही! वाटेत काय घडलं?
तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प-भगूर रस्त्यावर एका तरुणाचा बेशुद्ध अवस्थेत मृतदेह (Nashik Crime News) आढळून आला होता. हा मृतदेह गणेश पंजाब पठाडे या तरुणाचा असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाचा खून (Nashik Murder News) झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मूळचा हिंगोलीतील असलेला गणेश हा आपल्या बहिणीला सासरी सोडायला नाशिकला (Nashik) आला होता. पण बहिणीला सोडून पुन्हा माघारी परतत असताना अचानक त्याच्यासोबत नेमकं काय घडलं, याचं गूढ उकलण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

प्राथमिक तपासात, 26 वर्षीय गणेश पंजाब पठाडे (राहणार शिरसम, जिल्हा हिंगोली) याच्या मृत्यूचं कारण अमानुष मारहाण असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय. मात्र त्याला मारहाण कुणी केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

गणेश पठाडे हा त्याची बहीण प्रज्ञा कांबळेला सासरी सोडण्यासाठी नाशिकला आला होता. सकाळी नाश्ता करुन झाल्यानंतर गणेशला त्याच्या मोबाईलवर एक फोन आला होता. फोनवर बोलत बोलत तो घराबाहेर पडला. पण नंतर पुन्हा घरी जिवंत परतलाच नाही. त्यामुळे खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

बहीण प्रज्ञा हीने भाऊ गणेशला मोबाईलवर संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर संध्याकाळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हिंगोलीत मोलमजुरीचं काम करणाऱ्या गणेशच्या कमाईवर घर चालत होतं. त्याच्या पश्चात आई वडील आणि बहीण असा परिवार आहे. गणेशच्या संशयास्पद मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

गणेशच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आलेल्या नाहीत. दरम्यान, त्याच्या चेहऱ्यावर किरकोळ स्वरुपाच्या लहान जखमा आढळल्यात. गणेशची बहीण प्रज्ञा हीने नात्यातील व्यक्तीवर संशय असल्याचा आरोप केला आहे.

नाशिकमध्ये गणेशच्या परिचयाचं फार कुणी नव्हतं. अशातच संशयित आरोपींची ओळखही पोलिसांनी पटवली असल्याची माहिती मिळतेय. सध्या संशयित मारेकऱ्यांना अटक करण्याचं आणि गणेशच्या हत्येचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.