भावाच्या अपघाती मृत्यूला जबाबदार धरत कुटुंबाला संपवलं, पाच भावंडांनी एकाच कुटंबातील सात जणांचा काटा काढला !

आरोपी अशोक पवार याचा भाऊ धनंजय पवार यांचा अपघातात मृत्यू झाला होता. मात्र धनंजयच्या अपघाताला हे पवार कुटुंब कारणीभूत होतं, असा समज आरोपींचा होता. याच रागातून आोरपींनी ही हत्या केली.

भावाच्या अपघाती मृत्यूला जबाबदार धरत कुटुंबाला संपवलं, पाच भावंडांनी एकाच कुटंबातील सात जणांचा काटा काढला !
दौंडमधील कुटुंबाच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 25, 2023 | 3:27 PM

पुणे : पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना दौंडमधील पारगावमध्ये उघडकीस आली होती. भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह टप्प्याटप्प्याने आढळून आले होते. या सात जणांच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. पूर्ववैमनस्यातून या सात जणांची नात्यातील लोकांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. हत्येप्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी सख्खी भावंडे आहेत. आरोपींमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आरोपी आणि पीडित एकाच गावातील रहिवासी आहेत.

अशोक कल्याण पवार, शाम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकश कल्याण पवार आणि कांताबाई सर्जेराव जाधव (बहीण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं आहे.

टप्प्याटप्प्याने आढळले होते सात मृतदेह

दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत 18 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान टप्प्याटप्प्याने सात जणांचे मृतदेह आढळले होते. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करत मृतदेहांची ओळख पटवली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी अनेक पथके तयार केली होती. तपासादरम्यान पोलिसांना काही पुरावे हाती लागले. यावरुन घातपात करुन कुटुंबाची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

हत्याकांडामागील कारण काय?

आरोपी अशोक पवार याचा भाऊ धनंजय पवार यांचा अपघातात मृत्यू झाला होता. मात्र धनंजयच्या अपघाताला हे पवार कुटुंब कारणीभूत होतं, असा समज आरोपींचा होता. याच रागातून आोरपींनी ही हत्या केली.

करणी किंवा काळू जादू यातून हे मृत्यू झाल्याचा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. मात्र पोलीस तपासात हा अंदाज खोटा ठरला असून, ठरवून केलेले हत्याकांड असल्याचे उघड झाले आहे.