चार महिने भावासोबत राहिली, तीन दिवसांपूर्वीच सासरी परतली, पतीकडून विवाहितेची निर्घृण हत्या

लग्नानंतर महिलेचा पती, सासू आणि सासरे तिला सतत टोमणे मारायचे. हुंड्यासाठी शिवीगाळ आणि मारहाणही करायचे, असाआरोप विवाहितेच्या भावाने केला आहे. यासंदर्भात तिच्या कुटुंबाने यापूर्वी अनेकदा पंचायतीकडे धाव घेतली होती. विवाहिता गेल्या तीन ते चार महिन्यांपासून भावाकडे राहत होती.

चार महिने भावासोबत राहिली, तीन दिवसांपूर्वीच सासरी परतली, पतीकडून विवाहितेची निर्घृण हत्या
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Feb 07, 2022 | 6:44 AM

जयपूर : चार महिने माहेरी भावासोबत राहिल्यानंतर सासरी आलेल्या विवाहितेची हत्या (Married Lady Murder) करण्यात आली. राजस्थानमधील हनुमानगढ जिल्ह्यातील (Hanumangarh district of Rajasthan) पीलीबंगा येथील कालीबंगा गावात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. अवघ्या तीनच दिवसांपूर्वी पती तिला सासरी नांदायला घेऊन आला होता. त्यानंतर क्षुल्लक कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पतीने तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करत आरोपी पतीला बेड्आ ठोकल्या आहेत. हुंड्यासाठी विवाहितेचा सासरी वारंवार छळ होत असल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. मात्र आपण बायकोला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली नव्हती, असा दावा पतीने केला आहे.

विवाहितेचा 32 वर्षीय भाऊ रमेश कुमार याने यासंदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची बहीण संतोष (35 वर्ष) हिचा विवाह 2008 मध्ये कालीबंगा येथील शेरा राम नायक यांचा मुलगा सुभाष कुमारसोबत झाला होता.

हुंड्यासाठी विवाहितेचा सासरी छळ

लग्नानंतर तिचा पती सुभाष कुमार, सासू गुड्डी देवी आणि सासरा शेराराम हे संतोषला सतत टोमणे मारायचे. हुंड्यासाठी शिवीगाळ आणि मारहाणही करत असल्याचा आरोप विवाहितेच्या भावाने केला आहे. या कुटुंबाने यापूर्वीही अनेकदा पंचायतीकडे धाव घेतली होती. विवाहिता गेल्या तीन ते चार महिन्यांपासून भावाकडे राहत होती. चार दिवसांपूर्वी आरोपी सुभाष कुमार याने पत्नीला माहेराहून कालीबंगा येथे घेऊन गेला होता.

रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास

भावाच्या तक्रारीनुसार, सासू-सासऱ्यांच्या सांगण्यावरून तिचा पती सुभाष कुमार तिला हुंड्यासाठी मारहाण करायचा. भाऊ रमेश कुमार याने पोलिसांना सांगितले की, रविवारी सकाळी संतोषला मारहाण झाल्याची माहिती तिचा मोठा दीर पृथ्वीराज याने फोनवर दिली. तिला पिलीबंगा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. प्रकृती चिंताजनक झाल्याने हनुमानगड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

रमेश कुमार कुटुंबीयांसह हनुमानगड शासकीय रुग्णालयात पोहोचला. त्यानंतर काही वेळातच त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. मृत संतोषच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा होत्या. माहिती मिळताच पोलिस पोहोचले आणि त्यांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले.

गंभीर दुखापतीमुळे महिलेचा मृत्यू

डीएसपी पूनम यांनी सांगितले की, आरोपी पती सुभाष कुमार नायक याचा पत्नीसोबत अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करत नसल्याचे आरोपीने म्हटले आहे. मात्र गंभीर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन आरोपीला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. रमेश कुमारने सांगितले की, त्याची बहीण संतोषला 2 मुले आहेत -11 वर्षांचा करण आणि 9 वर्षांचा अभय. मात्र आईचा मृत्यू आणि वडिलांना तुरुंगवास झाल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळलं आहे.

संबंधित बातम्या :

11 वर्षांचे प्रेमसंबंध, मुंबईतील 28 वर्षीय तरुणीचा पालघरमध्ये खून, वयाने लहान बॉयफ्रेण्डला अटक

घरापासून 100 मीटरवर अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न मृतदेह, ऊसाच्या शेतात दोन आरोपी सापडले

बाळाच्या किरकिरण्याचा वैताग, बापाने दोन वर्षांच्या लेकीला संपवलं, स्टोव्हवरुन पडून अपघाताचा बनाव

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us