11th Admissions Offline: अकरावी ऑफलाइन प्रवेशाचे वेळापत्रक! 25, 26 जुलैला निवड यादी जाहीर होणार

| Updated on: Jul 20, 2022 | 7:27 AM

विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन 23 जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहे. मुंबई महानगर विकास क्षेत्राबाहेरील अकरावीच्या ऑफलाइन प्रवेशाला सुरुवात झाली आहे.

11th Admissions Offline: अकरावी ऑफलाइन प्रवेशाचे वेळापत्रक! 25, 26 जुलैला निवड यादी जाहीर होणार
11th Admission
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया (Online Process) सुरु झालीये ज्यात विद्यार्थ्यांनी पहिला भाग भरून झालाय. दुसरा भाग निकाल ज्यांचे बाकी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त सगळ्यांना चालू करून देण्यात आलाय. आता अकरावीच्या ऑफलाइन प्रवेशाला देखील सुरुवात करण्यात आलीये. त्यानुसार विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन 23 जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहे. मुंबई महानगर विकास क्षेत्राबाहेरील अकरावीच्या ऑफलाइन प्रवेशाला (Offline Entrance) सुरुवात झाली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ऑफलाइन प्रवेशाचे वेळापत्रक (Timetable For 11th Admissions) जाहीर केले असून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार 25 व 26 जुलैला निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे.

ऑफलाइन प्रवेशाचे वेळापत्रक

  • 23  जुलैपर्यंत प्रवेश अर्जाचे वितरण व संकलन
  • 25, 26 जुलै – गुणवत्तेनुसार निवड यादी, प्रतीक्षा यादी जाहीर करणे
  • 27 ते 30 जुलै- निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे
  • 1, 2 ऑगस्ट – जागा शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश
  • 3, 4 ऑगस्ट दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश

इथे होणार ऑफलाइन प्रवेश

  1. रायगड जिल्हा- पोलादपूर, महाड, तळा, खालापूर, खोपोली, श्रीवर्धन, माणगाव, सुधागड, रोहा, कर्जत, मुरूड, अलिबाग, पेण, उरण, म्हसळा.
  2. ठाणे जिल्हा – मुरबाड, शहापूर, अंबरनाथ ग्रामीण, कल्याण ग्रामीण.
  3. पालघर जिल्हा – पालघर, डहाणू, जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी, विक्रमगड.

…तरच विनाअनुदानित तुकड्यांमधील प्रवेश पूर्ण करावेत

कॉलेजनी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व प्रचलित आरक्षण धोरणानुसार प्रवेश द्यावेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात, अशा सूचना शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर अनुदानित तुकड्यांतील कमाल विद्यार्थी क्षमता पूर्ण झाल्यानंतरच क्रमाने विनाअनुदानित तुकड्यांमधील प्रवेश पूर्ण करावेत, असेही संगवे यांनी स्पष्ट केले. शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधांच्या प्रमाणात प्रवेश देणे कॉलेजना बंधनकारक असून शाळांमध्ये भौतिक व अन्य सुविधा ६० विद्यार्थ्यांची असल्यास ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असेही कॉलेजना सांगण्यात आले. कॉलेजमधील भौतिक सुविधा, बैठक व्यवस्था व प्रवेश क्षमता पडताळणीची कार्यवाही शिक्षणाधिकारी स्तरावर सुरू आहे. सदर पडताळणीमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध नसताना विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे आढळल्यास त्याची जबाबदारी प्राचार्य, शाळा व्यवस्थापनाची असेल.

10 ऑगस्टपर्यंत मुदत

ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेची एकत्रित माहिती गुणवत्ता यादीसह 10 ऑगस्टपर्यंत सादर करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी प्राचार्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर आलेल्या सर्व अर्जांची एकत्रित गुणवत्ता यादी, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीनुसार झालेले प्रवेश, प्रवर्गनिहाय रिक्त जागांची माहिती सादर करायची आहे.