CBSE : 13000 उत्तरपत्रिकांची फेरतपासणी होणार, शिक्षण मंत्रालयाची मोठी घोषणा
CBSE 12th Exam : विद्यार्थी आणि पालकांनी यंदा उत्तरपत्रिका तपासणीसाठी वापरण्यात आलेल्या OSM या डिजिटल प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे आता 13000 उत्तरपत्रिकांची फेरतपासणी केली जाणार आहे.

सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांनी यंदा उत्तरपत्रिका तपासणीसाठी वापरण्यात आलेल्या OSM या डिजिटल प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विद्यार्थ्यांचा आरोप होता की त्यांनी पेपर चांगले लिहिले असूनही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. अनेकांना 90 ते 95 टक्के गुणांची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्ष कमी मार्क्स मिळाल्याचे समोर आले होते. अशातच आता शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी पत्रकार परिषद घेत 13000 उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
OSM प्रणालीवर प्रश्नचिन्ह
संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘सीबीएसईने नुकतेच 12वीचे निकाल जाहीर केले आहेत. यावेळी मूल्यांकन OSM प्रणालीद्वारे करण्यात आले आणि त्यानंतर काही चिंता समोर आल्या. काही विद्यार्थ्यांना वाटत आहे की यंदा उत्तीर्ण टक्केवारी कमी झाली असून ती गेल्या वर्षीच्या 88 टक्क्यांवरून 85 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. काही विद्यार्थ्यांना असेही वाटते की त्यांना अधिक गुण मिळायला हवे होते, मात्र कमी गुण देण्यात आले. त्यामुळे या सर्व शंका आणि गैरसमजांबाबत आम्ही स्पष्टीकरण देऊ इच्छितो.’
संजय कुमार पुढे बोलताना म्हणाले की, ‘ऑन-स्क्रीन मार्किंग ही काही नवीन संकल्पना नाही आणि ती पहिल्यांदाच लागू करण्यात आलेली नाही. CBSE ने 2014 मध्ये प्रथम OSM प्रणाली सुरू केली होती. मात्र त्या वेळी तांत्रिक सुविधांच्या मर्यादांमुळे ही प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवता आली नव्हती. यंदा आम्ही ती यशस्वीपणे पुन्हा सुरू केली आहे.’
13 हजार उत्तरपत्रिकांची फेरतपासणी होणार
OSM संदर्भातील तक्रारींबाबत बोलताना संजय कुमार म्हणाले, ‘मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान काही त्रुटी आढळून आल्या आहेत. आता सुमारे 13 हजार उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे. यंदा 12वीच्या परीक्षांनंतर उत्तरपत्रिका स्कॅन करून त्यांची PDF तयार करण्यात आली होती. एकूण 98 लाख उत्तरपत्रिका स्कॅन करण्यात आल्या आणि सुरक्षेचे तीन स्तर तयार करण्यात आले होते. यामुळे गुणांची बेरीज करताना होणाऱ्या चुका पूर्णपणे टाळता आल्या. या प्रक्रियेसाठी शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते.
#WATCH | Delhi: Sanjay Kumar, Secretary, Department of School Education and Literacy, says, “This time when the 12th class exams were conducted, the answer sheets were scanned, and their PDF copies were made. The total number of answer sheets of 98 lakh students who took the… pic.twitter.com/cIeztuNgUF
— ANI (@ANI) May 17, 2026
पुढे बोलताना संजय कुमार यांनी सांगितले की, ‘आम्हाला सुमारे 13 हजार अशा उत्तरपत्रिका आढळल्या, ज्यामध्ये वापरलेली शाई खूप फिकी असल्यामुळे स्कॅन केल्यानंतर मजकूर स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे त्या उत्तरपत्रिका वेगळ्या काढून त्यांची मॅन्युअल तपासणी करण्याचे निर्देश शिक्षकांना देण्यात आले. त्यानंतर मिळालेले गुण नोंदवण्यात आले. ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये अचूकता राखण्यासाठी सुरक्षेच्या सर्व बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.’
री-चेकिंगसाठी 25 रुपयांची फी
संजय कुमार म्हणाले की, ‘ज्या विद्यार्थ्यांना स्वतःची उत्तरपत्रिका पाहायची आहे, त्यांच्याकडून 100 रुपये शुल्क घेतले जाईल. पेपर व्हेरिफिकेशनसाठी स्वतंत्र 100 रुपये शुल्क असेल आणि एखाद्या विशिष्ट प्रश्नाचे पुन्हा मूल्यांकन (री-चेकिंग) करून घ्यायचे असल्यास 25 रुपये शुल्क आकारले जाईल. मात्र पुनर्मूल्यांकनानंतर विद्यार्थ्यांचे गुण वाढल्यास त्यांनी भरलेली संपूर्ण फी परत केली जाईल.’