आपुल्याच घरात हाल सोसते मराठी…; दहावीत किती विद्यार्थी मराठीत नापास? आकडा वाचून धक्काच बसेल

राज्यात दहावीच्या निकालात मराठी विषयाची स्थिती चिंताजनक असून ९४,५४४ विद्यार्थी नापास झाले आहेत. प्रथम भाषा मराठीत ८० हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने भाषेच्या संवर्धनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आपुल्याच घरात हाल सोसते मराठी...; दहावीत किती विद्यार्थी मराठीत नापास? आकडा वाचून धक्काच बसेल
marathi
| Updated on: May 09, 2026 | 9:52 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच दहावीचा निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. महाराष्ट्रातील एकूण १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याचा निकाल समाधानकारक लागला असला तरी मराठी विषयाच्या निकालाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यात मराठी भाषा बारावीपर्यंत सक्तीची करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊनही प्रत्यक्ष निकालात मात्र मराठीची पीछेहाट सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत तब्बल ९४ हजार ५४४ विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत.

किती विद्यार्थी नापास?

यंदा दहावीचा मराठी विषयाचा निकाल ९२ टक्के इतका लागला आहे. याचाच अर्थ, परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८ टक्के विद्यार्थी आपल्या मातृभाषेतच पास झालेले नाहीत. तसेच यातील काही विद्यार्थी हे काठावर पास झाले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नापास झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८० हजार ८०३ विद्यार्थ्यांना प्रथम भाषा (First Language) म्हणून मराठी विषय घेतलेले आहेत. साधारण मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची ही अवस्था मराठी भाषेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

घसरणीची प्रमुख कारणे

शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, मराठी विषयातील या घसरणीला अनेक घटक कारणीभूत आहेत. आजकाल कॉन्व्हेंट संस्कृती वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा, तसेच त्यांच्या पालकांचा कल इंग्रजीकडे वाढला आहे. यामुळे मराठीचा वापर घरात आणि बाहेर बोलण्यापुरता मर्यादित राहिला आहे. व्याकरणाच्या नियमांचे अज्ञान, ऱ्हस्व-दीर्घ चुका आणि शुद्धलेखनाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे लेखी परीक्षेत विद्यार्थ्यांचे गुण मोठ्या प्रमाणावर कापले जात आहेत. तसेच, तंत्रज्ञानाच्या युगात अवांतर वाचनाची सवय सुटल्याने विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह कमालीचा घटला आहे.

दरम्यान या निकालानंतर आता शाळांमध्ये मराठी शिकवण्याच्या पद्धतीतही काळानुसार बदल होणे आवश्यक आहे. केवळ पाठांतर आणि उत्तरपत्रिका भरण्यावर भर न देता, भाषेचे उपयोजन आणि गोडी निर्माण करण्यावर शिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मराठी विषयाची ही दयनीय स्थिती सुधारण्यासाठी केवळ सक्तीचे कायदे पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये भाषेबद्दल प्रेम निर्माण होणे ही काळाची गरज बनली आहे.

Follow Us