Students : त्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, आपण टुरिस्टला प्रवेश नाकारला ! भारताचं जशास तसं उत्तर…

चीन भारताच्या तब्बल 22 हजार विद्यार्थ्यांना चीनमध्ये प्रवेश देत नाही, चीनच्या याच कृत्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातं. हे विद्यार्थी चीनच्या विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतात. त्यातील काही मेडिकलचे विद्यार्थी आहेत. 2020 च्या सुरुवातीला चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला तेव्हा ही मुलं भारतात परत आली.

Students : त्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, आपण टुरिस्टला प्रवेश नाकारला ! भारताचं जशास तसं उत्तर...
भारताचं जशास तसं उत्तर...
Image Credit source: facebook
Rachana Bhondave | Updated on: Apr 24, 2022 | 8:04 PM

नवी दिल्ली : 2020 ला मध्ये चीनमध्ये कोरोनाचा (Corona) शिरकाव झाला तेव्हा तिथल्या अनेक शिक्षण संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत होते. कोरोना महामारीनंतर त्याच विद्यार्थ्यांना भारतात परत येण्याशिवाय पर्याय नव्हता. आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रण आल्यानंतर चीन (China)याच परत आलेल्या विद्यार्थ्यांच्या (Students)भविष्याशी खेळतंय. चीनच्या या भूमिकेला सडेतोड उत्तर देताना भारताने चिनी नागरिकांना भारताकडून देण्यात येणारा टुरिस्ट व्हिसा निलंबित केलाय. चिनी नागरिकांना आता टुरिस्ट व्हिसावर भारतात येता येणार नाही. चीन भारताच्या तब्बल 22 हजार विद्यार्थ्यांना चीनमध्ये प्रवेश देत नाही, चीनच्या याच कृत्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातं.

हे विद्यार्थी चीनच्या विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतात. त्यातील काही मेडिकलचे विद्यार्थी आहेत. 2020 च्या सुरुवातीला चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला तेव्हा ही मुलं भारतात परत आली. मात्र आता कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर सुद्धा चीन या विद्यार्थ्यांना आपल्या देशात प्रवेश करू देत नाही.

जगभरातील विमान कंपन्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन या संस्थेने 20 एप्रिल रोजी काढलेल्या परिपत्रकाचा हवाला देत म्हटलंय कि, चिनी नागरिकांना देण्यात येणारा भारतीय पर्यटक व्हिसा आता वैध राहिलेला नाही. आयएटीए जगातील 80 टक्के जागतिक वाहतूक नियंत्रित करते.

आयएटीएने दिलेल्या माहितीनुसार, भूतानचे नागरिक, भारतीय, भारतीय, मालदीव आणि नेपाळमधील प्रवासी, भारताने ज्यांना निवास परवाने दिले आहेत, ज्या प्रवाशांना भारताने व्हिसा किंवा ई- व्हिसा दिला आहे, ज्या प्रवाशांकडे आता ओसीआय कार्ड आहे, ज्या प्रवाशांकडे आता पीआयओ कार्ड आहे, ज्या प्रवाशांकडे आता डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहेत अशा प्रवाशांना भारतात येण्याची परवानगी आहे.

आयएटीएने असंही म्हटलंय की, ज्या पर्यटक व्हिसाची वैधता 10 वर्षांची होती, ते आता वैध नाहीत. चिनी नागरिकांच्या टुरिस्ट व्हिसाच्या मुदत संपल्याने आता त्यांना भारतात प्रवेश करणं सोपं नाही. त्यासाठी त्यांना संपूर्ण प्रक्रियेतून जावे लागणार आहे.

भारतीय विद्यार्थी वर्गासाठी तळमळत आहेत

२०२० मध्ये चीनमध्ये कोरोनाचा स्फोट झाला तेव्हा त्यावेळी हजारो भारतीय मुलं-मुली वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत होते. कोरोनाचा संसर्ग सुरु होताच तिथून त्यांना भारतात परत यावं लागलं. यानंतर त्यांचा ऑनलाईन अभ्यास अजून सुरु झालेला नाही. या विद्यार्थ्यांना चीनमध्ये परतायचं आहे, मात्र चीन सरकार त्यांना परवानगी देत नाही.

नवी दिल्लीने बीजिंगला वारंवार या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यास सांगितलं आहे. चीनच्या अशा कृत्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक कारकीर्द आता धोक्यात आली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी १७ मार्च रोजी म्हटलंय.

भारताने चीनला अनेकदा विनंती केली

अरिंदम बागची म्हणाले की, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ८ फेब्रुवारी रोजी सांगितले होते की, चीन या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहे आणि परदेशी विद्यार्थ्यांना चीनमध्ये परतण्याची परवानगी देण्याच्या व्यवस्थेची चौकशी केली जात आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या भूमिकेवर निराशा व्यक्त केली . तेव्हा अरिंदम बागची म्हणाले होते की, “आजपर्यंत चीनने भारतीय विद्यार्थ्यांच्या परत येण्याला कोणताही स्पष्ट प्रतिसाद दिलेला नाही. आमच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनुकूल भूमिका घ्यावी आणि त्यांनी त्यांना लवकरात लवकर परत येण्याची परवानगी द्यावी जेणेकरून आमचे विद्यार्थी त्यांचे शिक्षण घेऊ शकतील. ”

ते म्हणाले गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दुशांबे इथे झालेल्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याकडेही हा मुद्दा उपस्थित केला होता. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ताजिक राजधानीच्या शहरात दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली. मात्र, भारताने अनेकदा विनंती केल्यानंतरही चीनने या प्रकरणी उडवाउडवीची भूमिका घेणे सुरूच ठेवले. त्यांनंतर भारताने आता हे प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us