Explainer : मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय? मराठा आरक्षण आंदोलनात काय मिळणार?
जरांगेंनी त्यांच्या 11 व्या उपोषणाला निर्णायक आंदोलन म्हटलंय. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघारी नाही, अशी ठाम भूमिका जरांगेंची आहे. जरांगेंच्या मागण्या असंवैधानिक असून त्यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळूच शकत नाही, अशी भूमिका बारस्कर यांनी घेतलीय.

Manoj Jarange Patil Reservation : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाऊन उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी राज्यभरातील मराठा समाजाला मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात जरांगे हे मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे जरांगे त्यांच्या समर्थकांसह मुंबईत दाखल झाले तर गणेशोत्सवाच्या काळात सरकारपुढे मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळेच सरकार यावर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासंदर्भातील आपल्या मागण्या आक्रमक पवित्रा घेतलेला असताना अजय बारस्कर महाराजांनी जरांगेंनी उपोषणावरच शंका घेतली आहे. ज्या 4 लोकप्रतिनिधींचं जातप्रमाणपत्र जातवैधता समितीने रद्द केलेलं आहे त्यांचीच सुपारी घेऊन जरांगे मुंबईत येत असल्याचा आरोप बारस्कारांनी केलाय.
एकूण चार जातप्रमाणपत्र रद्द
छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीड या 3 जिल्ह्यात मराठा समाजाला कुणबी असल्याचे 4 जातप्रमाणपत्र रद्द झालेत. ज्यात परभणीत दादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या कोमल पारवे, छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रहारच्या जिल्हा परिषद सदस्या ज्योती शिंदे आणि बीडमध्ये माजलगावच्या दादांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेखा अंबुरे-सरोदे तसंचं संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूरच्या नगरपरिषदेच्या नगरसेविका वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. या चौघांचंही जातप्रमाणपत्र वैध करा अशी मागणी जरांगेंची आहे.
बारस्कर यांचं नेमकं म्हणणं काय?
तर इकडे जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या घोषणेनंतर ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडेंनी सरकारला इशारा दिलाय. सरसकट कुणबी जातप्रमाणपत्रांचं वाटप किंवा ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागतो याकडे लक्ष असल्याचं तायवाडे म्हणाले आहेत. दुसरीकडे जरांगेंनी त्यांच्या 11 व्या उपोषणाला निर्णायक आंदोलन म्हटलंय. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघारी नाही, अशी ठाम भूमिका जरांगेंची आहे. जरांगेंच्या मागण्या असंवैधानिक असून त्यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळूच शकत नाही, अशी भूमिका बारस्कर यांनी घेतलीय. मी फाशी घेऊन सांगतो की जरांगे म्हणतात त्याप्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. जरांगेला मुख्यमंत्री केलं तरी ते म्हणतात त्याप्रमाणे मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत. मग ते आग्रही का आहेत. मराठा समाजाला SEBC आणि OBC आरक्षण आहेच, असा हल्लाबोल बारस्कर महाराजांनी केलाय. दरम्यान, नियमात आणि जे संवैधानिक असेल त्याप्रमाणे सरकार निर्णय घेईल, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आता यावेळचा आंदोलनाचा तोडगा कशावर निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
