शिक्षणाची ओढ असल्यासही प्रतिकूल परिस्थितीत यश मिळतं, यशोमती ठाकूर यांच्याकडून बालगृहातील विद्यार्थ्यांचं कौतुक

कौटुंबिक प्रेम आणि सुरक्षित वातावरण हेच यश मिळवण्यामागचे गमक असते असे नाही तर जिद्द आणि शिक्षणाची ओढ असल्यास प्रतिकूल परिस्थितीतही यशाला गवसणी घालता येते हे या मुलांनी दाखवून दिले आहे, अशा शब्दात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या बालकांचे कौतुक केले आहे.

शिक्षणाची ओढ असल्यासही प्रतिकूल परिस्थितीत यश मिळतं, यशोमती ठाकूर यांच्याकडून बालगृहातील विद्यार्थ्यांचं कौतुक
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 06, 2021 | 4:51 PM

मुंबई : राज्यातील बालगृहातील 209 विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता 12 वी) उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळवले आहे. कौटुंबिक प्रेम आणि सुरक्षित वातावरण हेच यश मिळवण्यामागचे गमक असते असे नाही तर जिद्द आणि शिक्षणाची ओढ असल्यास प्रतिकूल परिस्थितीतही यशाला गवसणी घालता येते हे या मुलांनी दाखवून दिले आहे, अशा शब्दात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या बालकांचे कौतुक केले आहे.

राज्यातील विविध कारणास्तव काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीकडे सादर केली जातात. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर या बालकांना बालगृहात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना (चाईल्ड इन कॉन्फ्लि क्ट विथ लॉ) पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते.

अनाथ, निराधार बालके. एक पालक असलेली, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहीत मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे आदी कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण व जन्मदेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच.आय.व्ही.ग्रस्त / बाधित बालके, पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील बालके, कामगार विभागाने सुटका केलेले आणि प्रमाणित केलेले शाळेत न जाणारे बाल कामगार आदींना बालगृहात ठेवले जाते. या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत घेतली जाते. त्यासाठी या मुलांना शालेय तसेच उच्च शिक्षण यासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाते.

पुण्यातील बालगृहातील विद्यार्थीनी प्रथम

यशस्वी होण्यासाठी सर्व सुविधाच हव्यात असे नाही तर जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश मिळवता येते हे या निमित्त्ताने बालगृहांमधील बालकांनी दाखवून दिले आहे. या विद्यार्थ्यांमधील उभ्यासाची वृत्ती, हुशारी जोखण्याचे काम महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केले असून त्यांना अभ्यासाला प्रोत्साहित केले. त्यामुळे आणि या मुलांनी अविरत मेहनत घेऊन केलेल्या अभ्यासाला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे या 290 पैकी पुण्यातील बालगृहाच्या मुलीने एकूण 90.66 टक्के गुण मिळवत बालगृहातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

पुणे जिल्हयातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण

राज्यात पुणे विभागांतर्गत पुणे जिल्ह्यातील बालगृहातील सर्वाधिक 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दुसऱ्या क्रमांकावर मुंबई असून येथील 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवले आहेत. 80 ते 90 टक्के गुण मिळवलेले 34 विद्यार्थी आहेत. 70 ते 80 टक्के गुण मिळालेले 86 विद्यार्थी, 60 ते 70 टक्के गुण मिळालेले 69 विद्यार्थी तर 60 टक्क्याहून कमी गुण मिळवत उत्तीर्ण झालेले 18 विद्यार्थी आहेत.

या सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनींचे मंत्री ॲड. ठाकूर, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव इद्झेस कुंदन तसेच आयुक्त राहूल मोरे यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी तसेच पुनर्वसनाच्या दृष्टीकोनातून कौशल्य विकासासाठी शासनाकडून शक्य ती मदत पुरवण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.

इतर बातम्या:

‘लोकल प्रवास नाकारणारं हे जनताविरोधी ठाकरे सरकार’, भातखळकरांचा हल्लाबोल; कांदिवलीत रेलभरो आंदोलन

OnePlus चा ‘हा’ ढासू स्मार्टफोन आता नव्या रंगात, 9 सिरीजअंतर्गत नवं मॉडेल

Yashomati Thakur congratulate studnets who pass hsc exam child rehabilitation center

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us