Pramod Sawant : गोव्यात भाजपचं सरकार येणार; संजय राऊत राज्यात का येतात? त्यांचा इथं एक सरपंचही नाही, प्रमोद सावंत यांनी डिवचलं

| Updated on: Jan 07, 2022 | 12:34 PM

शिवसेना, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी या पक्षांचे मुळात गोव्यात अस्तित्व नाही. त्यामुळे महाविकास आघाडी किती चालेल ? कशापद्धतीने चालेल ? हा मुद्दा आहे.

Pramod Sawant : गोव्यात भाजपचं सरकार येणार; संजय राऊत राज्यात का येतात? त्यांचा इथं एक सरपंचही नाही, प्रमोद सावंत यांनी डिवचलं
Pramod Sawant
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: गोवा विधानसभेची निवडणूक (Goa Assembly Election 2022) अवघ्या काही दिवसांवर आलीय. निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची घोषणा होणं अद्याप बाकी आहे. गोव्यातील निवडणुकीवर तृणमूल काँग्रेस (TMC), आपनं (AAP) लक्ष केंद्रीत केलंय. गोव्याची निवडणूक देखील यावेळी हाय व्होल्टेज ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीनं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याशी संवाद साधला. गोव्यात यावेळी भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार असल्याचे ते म्हणाले. 2022 मघ्ये 22 प्लसचा नारा असून स्वयं पूर्ण गोव्यासाठी मतदार भाजपलाच मतदान करतील, असं ते म्हणाले. गोव्यात अस्तित्वच नसलेले पक्ष (तृणमूल काँग्रेस, आप) प्रयोग करण्यासाठी आले आहेत. बाहेरून आलेल्या पक्षांनी एकदा गेल्या निवडणूका आठवून पाहाव्यात, असं सावंत म्हणाले. संजय राऊत गोव्यात का येतात हे त्यांचे त्यांनाच ठाऊक ! शिवसेनेचा साधा सरपंचही गोव्यात नाही, असंही प्रमोद सावंत म्हणाले.

अन्य पक्षाचे आमदार फोडण्याचा काळ संपला

अन्य राजकीय पक्षांचे आमदार फोडून सरकार स्थापन करण्याचा काळ आता संपला. कोरोना काळात प्रकल्पांची उदघाटने राहिली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुका आता जाहीर होणे अपेक्षित असताना ही उदघाटने होत आहेत. ‘गोवा प्रगती’ कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या विभागाने केलेली कामे आम्ही लोकांपुढे घेऊन जात आहोत. इथे डबल इंजिन सरकार आहे. केंद्रात मोदींजींचे सरकार आणि राज्यातही भाजपचे सरकार येणार असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

स्वयं पूर्ण गोव्यासाठी भाजपलाच पसंती मिळेल

आत्मनिर्भर भारत स्वयं पूर्ण गोवा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवला तो परत एकदा लोकांकडे घेऊन जाणार आहे. गोवा मुक्तीनंतरच्या 60 वर्षांच्या इतिहास जितका विकास झाला नाही तितका डबल इंजिन सरकारने केला आहे. तो लोकांपुढे घेऊन जाणार आहोत. आमचे रिपोर्ट कार्ड तयार आहे. आम्ही केलेली कामे लोकांपुढे घेऊन जाणार आहोत, असं प्रमोद सावंत म्हणाले.

गोवेकरांचा माझ्यावर आणि नरेंद्र मोदींवर विश्वास

शिवसेना, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी या पक्षांचे मुळात गोव्यात अस्तित्व नाही. त्यामुळे महाविकास आघाडी किती चालेल ? कशापद्धतीने चालेल ? हा मुद्दा आहे. कोण कुणाला ऑक्सिजन पुरवतो आहे ते मला माहित नाही. पूर्ण गोवेकरांचा माझ्यावर, भाजप आणि मोदींजींवर विश्वास आहे. आम्ही केलेली कामे घेऊन लोकांपुढे जाणार आहोत. त्यांच्या उद्देश आहे भाजपला हरवणे. आमचा उद्देश आहे जनतेच्या सेवेसाठी परत एकदा सत्तेत येणं… स्वयं पूर्ण गोव्यासाठी आम्ही लोकांना साद दिलीय, तुम्ही आम्हाला सेवेसाठी पुन्हा एकदा संधी द्यावी, असं प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल गोव्यात येतात याची चिंता नाही

भाजपचे दिगग्ज राष्ट्रीय नेते गोव्यात येऊन गेले आणि अजूनही येत आहेत. त्यामुळे अन्य राजकीय पक्षांचे ( ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल) नेत्यांपैकी कोण येतोय, किती दिवस राहतोय याची मला चिंता नाही. आमचे नेते गोव्याला काही प्रकल्प देऊन जातात म्हणून ते आठवणीत राहतात. मोदींनी गोव्याच्या विकासासाठी गेल्या 8 वर्षात 22 हजार कोटी दिले ते कायम लोकांच्या लक्षात राहील, असं सावंत यांनी सांगितलं. बाकी अन्य कुणी इथे येऊन प्रयोग करायचा प्रयत्न करीत असेल तर आमची जनता सुज्ञ आहे. खरं काय आणि खोटं काय हे त्यांना समजते. त्यामुळे दिल्लीवाल्यांच्या ( अरविंद केजरीवाल) ते बळी पडणारे नाही. दिल्लीत किती प्रदुषण आहे आणि पश्चिम बंगालमध्ये किती असंस्कृतिरित्या राज्य चालवले जाते हे सर्व समाज माध्यमे आणि प्रसारमध्यमांवर पाहात आहेत. बाहेरून आलेल्या राजकीय पक्षांना त्यांना मागची निवडणूक आठवण करून देणे गरजेचे असल्याचा टोला प्रमोद सांवत यांनी लगावला.

संजय राऊत यांच्या पक्षाचा साधा सरपंचही नाही, ते का येतात?

2022 मध्ये स्वयं पूर्ण गोव्यासाठी भाजपला निवडून देतील याची मला खात्री आहे.देवेंद्र फडणवीस पक्षाकडून गोव्याचे प्रभारी आहेत. त्यांचा अनुभव हा गोव्यातील लोकांना फायदेशीर ठरेल. संजय राऊत गोव्यात का येतात हे मला माहित नाही ! त्यांच्या पक्षाचा गोव्यात साधा सरपंचही नाही.त्यामुळे ते कुणाला येऊन भेटतात आणि काय करतात हे त्यांचे त्यांना विचारायला हवे, असा सवाल प्रमोद सावंत यांनी केला.

काँग्रेसचा केवळ एक आमदार राहिलाय

काँग्रेसच्या आमदारांची संख्या किती आहे ते आधी दिगंम्बर कामत यांनी बघावे. या विधानसभा सभेत आता काँग्रेसचा एकच आमदार राहिला आहे..त्यामुळे आमच्या आमदारांच्या संख्येची चिंता त्यांनी करू नये. आम्ही 2022 मध्ये पूर्ण बहुमतात, 22 प्लस चा नारा दिला आहे. जनता आम्हाला पूर्ण बहुमताचे सरकार देईल.

भाजपला बहुमत मिळणार

प्रत्येकाला राजकीय इच्छा आकांक्षा असतात. निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही तर तो दुसऱ्या पक्षात जातो, आणि तिकीट मिळत असतानाही जात असेल तर तो कशासाठी जातोय हे लोकांनी ठरवायला हवे. सगळेच जण समाजकारणासाठी नाही तर वेगळ्या कारणासाठी पक्ष बदलतात.

अन्य पक्षांचे आमदार फोडून सरकार स्थापन करण्याचा काळ संपला आहे. 2022 मध्ये 22 प्लसचे बहुमत मतदार भाजपला देतील. गोव्यातील जनता आता आमदारांसाठी नाही सरकारसाठी मत देणार आहे. त्यामुळे पूर्ण गोव्यातील मतदार संघात बहुमतासाठी भाजपला मतदान, स्वयं पूर्ण गोव्यासाठी भाजपला मतदान हे लोकांनी ठरवलंय.

गोव्यात भाजपच्या पुढच्या बहुमतातील सरकारचे नेतृत्व कुणी करायचे का निर्णय पक्ष घेईल. माझ्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुकांना सामोरे जातोय त्यामुळे नक्कीच पक्ष याबाबतीत निर्णय घेईल.

इतर बातम्या:

Mumbai | मुंबईत कोरोना संख्येचा विस्फोट, दादर मार्केटमध्ये तुफान गर्दी, मुंबईकरांना गांभीर्य नाही!

Goa CM Pramod Sawant said BJP came in power again why sanjay raut came in goa if they have not one sarpanch in state