सरोगसीने मुलाच्या जन्माआधी अनेकदा गर्भपात; आमिर खानच्या पूर्व पत्नीचा खुलासा
आमिर आणि किरणने 2005 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. तर 2011 मध्ये तिने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला. आमिरचं हे दुसरं लग्न होतं. या दोघांना आझाद हा मुलगा आहे.
अभिनेता आमिर खानची पूर्व पत्नी किरण राव हिने 2011 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून मुलाला जन्म दिला. आमिर आणि किरण आता विभक्त झाले आहेत. घटस्फोटानंतर दोघं मिळून मुलाचा सांभाळ करतायत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरण तिच्या गर्भपाताविषयी व्यक्त झाली. आझादच्या जन्मापूर्वी अनेकदा गर्भपात झाल्याचं तिने सांगितलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत किरण म्हणाली, “ज्या वर्षी मी माझा धोबी घाट हा चित्रपट बनवला होता, त्याच वर्षी मुलगा आझादचा जन्म झाला. त्याच्या जन्माआधी मला आरोग्याच्या बऱ्याच समस्या होत्या. प्रेग्नंट होण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले होते. पण ते सर्व प्रयत्न फेल ठरले.”
पाच वर्षांत अनेकदा गर्भपात
गर्भपाताविषयी किरण पुढे म्हणाली, “मी बाळासाठी खूप प्रयत्न केले. पाच वर्षांत माझा अनेकदा गर्भपात झाला होता. त्यावेळी मी अनेक वैयक्तिक आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना केला. बाळाला जन्म देणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मी गरोदरपणासाठी खूप उत्सुक होती. म्हणूनच आझादच्या जन्मानंतर मला वेगळा कोणता निर्णय घ्यावाच लागला नाही. मला माझा पूर्ण वेळ त्याच्या संगोपनासाठी द्यायचा होता.”
मुलगा बॉलिवूडमध्ये करिअर करणार का?
मुलाच्या जन्मानंतर किरणने दिग्दर्शनातून ब्रेक घेतला. आता दहा वर्षांनंतर तिने कमबॅक केलं आहे. ‘लापता लेडीज’ हा तिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाचं प्रमोशन किरण आणि आमिरने मिळून केलं होतं. मुलगा आझादसुद्धा चित्रपटसृष्टीत काम करणार का, असा प्रश्न किरणला या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर तिने सांगितलं, “नाही, आता तरी अजिबात नाही. त्याला सध्यातरी चित्रपटांशी संबंधित काहीच करायचं नाहीये. त्याला चित्रपटांमध्ये फारसा रस नाही. त्याला कला, संगीत, ॲनिमेशन यांची आवड आहे.”
अभिनेता आमिर खान आणि किरण राव हे 2021 मध्ये विभक्त झाले. लग्नाच्या 15 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतरही दोघांमध्ये मैत्रीचं नातं कायम आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरण राव घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “लग्नाआधी मी आणि आमिर जवळपास वर्षभर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होतो. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्या, आम्ही आईवडिलांमुळे लग्न केलं”, असं तिने स्पष्ट केलं. जर वैवाहिक आयुष्यात एखाद्या जोडीदाराला गुदमरल्यासारखं वाटत असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असंही तिने म्हटलं होतं.