ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन; वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Mar 18, 2023 | 9:53 AM

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन... भालचंद्र कुलकर्णी यांनी ३०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं... आता त्यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन;  वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Follow us on

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन शनिवारी (18 मार्च) सकाळी कोल्हापूर याठिकाणी झालं आहे. भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनानंतर मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनानंतर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. सध्या सर्वत्र भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनाची चर्चा सुरू आहे.

साधा चित्रकर्मी, कलासंपन्न नाट्यकर्मी, लोककला अभ्यासक, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, गीतकार अशी भालचंद्र कुलकर्णी यांची ओळख होती. भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनानंतर कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे.. असं म्हणायला हरकत नाही. भालचंद्र कुलकर्णी यांनी ३०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं… आता त्यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

कोल्हपूर याठिकाणी अल्पशा आजाराने भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झालं. भालचंद्र कुलकर्णी यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापासून जवळपास सकाळी साडेअकराच्या सुमारास निघणार आहे. तर दुपारी १२ वाजता कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमी याठिकाणी भालचंद्र कुलकर्णी यांच्याव अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भालचंद्र कुलकर्णी यांनी अनेक सिनेमांध्ये महत्त्वाची भूमिका साकारली एवढंच नाही त्यांची काही गाणी देखील प्रचंड गाजली. ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘माहेरची साडी’, ‘मर्दानी’, ‘मासूम’, ‘झुंज तुझी माझी’, ‘नवरा नको गं बाई’, ‘पिंजरा’, ‘थरथराट’, ‘मुंबईचा जावाई’ ‘सोंगाड्या’ अशा अनेक सिनेमांमध्ये भालचंद्र कुलकर्णी यांनी दमदार भूमिका साकारल्या.

जवळपास पाच दशकं भालचंद्र कुलकर्णी यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण गेल्या अनेक वर्षांपासून भालचंद्र कुलकर्णी रुपेरी पडद्यापासून दूर होते. महत्त्वाचं म्हणजे काही महिन्यांपूर्वी भालचंद्र कुलकर्णी यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

मराठी कलाविश्वातील भालचंद्र कुलकर्णी यांचं योगदान फार मोठं राहिलं आहे. भालचंद्र कुलकर्णी यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांचं मराठी कलाविश्वातील योगदान कधीही विसरता येणार नाही…