वर्षा उसगांवकर यांच्या आयुष्यातील ‘महाभारत’… ही गोष्ट कुणालाच माहीत नसेल

महाभारत या सीरिअलने एक काळ गाजवला. ही एक ऐतिहासिक आणि अजरामर सीरिअल ठरली. महाभारत रविवारी सकाळी लागायचं. तेव्हा रस्ते ओस पडलेले असायचे. जणूकाही कर्फ्यू लागला की काय अशी शांतता असायची. सर्वजण टीव्हीसमोर बसून सीरिअल बघायचे. जणू काही आपणच त्या काळात आहोत की काय असं प्रत्येकाला वाटायचं. पण या सीरिअलचा एक किस्सा आहे...

वर्षा उसगांवकर यांच्या आयुष्यातील महाभारत... ही गोष्ट कुणालाच माहीत नसेल
वर्षा उसगांवकर यांच्या आयुष्यातील 'महाभारत'
| Updated on: Aug 13, 2024 | 2:11 PM

अभिनेत्री वर्षा उसगांवर सध्या ओटीटी बिग बॉस मराठी-5 मध्ये आल्या आहेत. बिग बॉसमध्ये त्यांचे सहकाऱ्यांसोबतचे वाद चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुळे वर्षा उसगांवकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिगत जीवनावरही बरंच काही लिहून येत आहे. 80च्या दशकातील त्यांचा असाच एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे. वर्षा उसगांवकर या महाभारत या सर्वात मोठ्या टीव्ही सीरिअलमध्ये त्यांची कशी एन्ट्री झाली याबाबतचा हा किस्सा आहे.

80 च्या दशकात केवळ दूरदर्शन हेच एकमेव मनोरंजनाचं साधन होतं. त्याकाळी ‘हम लोग’, ‘बुनियाद’, ‘नुक्कड़’, ‘सर्कस’ आदी मालिका दूरदर्शनला लागायच्या. या मालिका प्रचंड गाजल्याही होत्या. सामान्य लोकांचं जीवनदर्शन या मालिकांमधून घडायचं. काही मालिका गंभीर होत्या. तर काही मालिका नर्मविनोदी होत्या. त्याच काळात बीआर चोप्राा यांनी एक धाडसी पाऊल टाकलं. त्यांनी महाभारत सीरिअलची निर्मिती केली.ही सीरिअल प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. सीरिअलने इतिहास घडवला. आजही लोक ही सीरिअल विसरले नाहीत.

महाभारतातील फेमस कॅरेक्टर

बीआर चोपडा यांच्या महाभारताचे अनेक किस्से आहेत. महाभारतातील प्रत्येक कॅरेक्टर करणाऱ्या अभिनेत्यांच्या कास्टिंगची वेगळीच कहाणी आहे. या मालिकेत उत्तराची भूमिका अत्यंत गाजली होती. ही भूमिका वर्षा उसगांवकर यांनी साकारली होती. त्यावेळी वर्षा उसगांवकर अनेक टीव्ही सीरिअल्समध्ये काम करत होत्या. त्या ग्लॅमर वर्ल्डमधील प्रसिद्ध चेहरा होत्या. आजही आहेत. त्यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यात महाभारत कसं आलं? याचा किस्सा ऐकवला होता.

आणि उत्तराचा शोध संपला

आपल्याला उत्तराचा रोल योगायोगाने मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्या सेटवर शुटिंग पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अभिमन्युसोबत एक सीक्वेन्स सीन सुरू होता. त्यासाठी त्यांच्या पत्नीची भूमिका निभावण्या करिता अभिनेत्रीचा शोध सुरू होता. उत्तराचं कॅरेक्टर निभवायचं होतं. पण अट एक होती. ती म्हणजे अभिनेत्रीला शास्त्रीय नृत्याची जाण असणं महत्त्वाचं होतं. मी जेव्हा सेटवर गेले, तेव्हा प्रोडक्शन डिझायनर गुफी पेंटल यांची नजर माझ्यावर गेली. ते माझ्याकडे आले आणि उत्तराची भूमिका करणार का? असं विचारलं. याची माहिती माझ्या आईवडिलांना मिळाली. तेव्हा त्यांनी होकार दिला. महाभारत या महान सीरिअलचा मी भाग होणार याचा आनंद माझ्यापेक्षा माझ्या आईवडिलांना अधिक झाला होता, असं सांगतानाच मला शास्त्रीय नृत्य येत होतं, हा माझा प्लस पॉइंट होता, असंही वर्षा उसगांवकर म्हणाल्या.

ऑडिनशची गरजच नव्हती

कोणत्याही स्क्रीन टेस्टशिवाय माझा उत्तराचा रोल फिक्स झाला होता. सर्व काही फायनल झालं आणि मी महाभारतातील उत्तरा बनले, असं त्या म्हणाल्या.