Kalyan Traffic Jam : कल्याणच्या वाहतूक कोंडीने रंगभूमीला लावला ब्रेक; ‘ऑल द बेस्ट’चा प्रयोग उशिराने सुरू
कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या लोकप्रिय आणि हाऊसफुल्ल ठरणाऱ्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा प्रयोग वाहतूक कोंडीमुळे बऱ्याच उशीराने सुरू झाला. कलाकारांनी माफी मागितली, मात्र वाहतूक कोंडीचा त्रास वाढतच चालल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

मुंबईत राहणाऱ्यांसाठी वाहतूक कोंडी हा रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांनाही या समस्येचा दिवसेंदिवस अधिक तीव्र अनुभव येत आहे. किरकोळ कारणावरूनही तासन्तास वाहतूक ठप्प होणे, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे आणि महत्त्वाचा वेळ वाया जाणे, हे आता येथील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. अनेकदा प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करूनही या समस्येवर ठोस उपाय होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. या वाहतूक कोंडीचा फटका आतापर्यंत सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांना बसत होता. मात्र आता या समस्येची झळ सांस्कृतिक क्षेत्रालाही बसू लागली आहे.
कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या लोकप्रिय आणि हाऊसफुल्ल ठरणाऱ्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा प्रयोग वाहतूक कोंडीमुळे तब्बल अर्धा तास उशिराने सुरू करावा लागला. शहरातील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे कलाकारांची गाडी वेळेत रंगमंदिरापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे रंगमंचावरील पडदा उघडण्यास विलंब झाला.
कल्याणमध्ये मोठी कोंडी
कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर हे शहरातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते. येथे दररोज विविध नाटकांचे प्रयोग होत असतात. कल्याण, डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमधून आणि गावांमधून मोठ्या संख्येने नाट्यरसिक या प्रयोगांना उपस्थित राहतात. त्यामुळे या परिसरातील वाहतूक सुरळीत असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
विशेषतः कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना स्टेशन रोड आणि नवा स्टेशन रोड या भागांमध्ये वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडालेला दिसतो. फूटपाथवर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे चालण्यासाठी जागा उरलेली नाही. परिणामी अनेक नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागते, ज्यामुळे वाहतुकीची समस्या आणखी गंभीर बनते. ही कोंडी सोडवण्यात वाहतूक विभागाला अद्याप यश आलेले नसल्याची टीका नागरिकांकडून सातत्याने होत आहे.
कलाकारांनी मागितली माफी
रविवारी सायंकाळी ४ वाजता ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. नाट्यगृहात प्रेक्षकांनी वेळेआधीच मोठी गर्दी केली होती. मात्र कलाकार वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे आयोजकांना वारंवार घोषणा करून प्रेक्षकांना परिस्थितीची माहिती द्यावी लागली. कलाकारांच्या प्रती असलेल्या प्रेमामुळे आणि नाटकाविषयीच्या उत्सुकतेमुळे प्रेक्षकांनी संयमाने प्रतीक्षा केली. अखेर कलाकार रंगमंदिरात पोहोचल्यानंतर नाटकाचा पडदा उघडला आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. मात्र नियोजित वेळेपेक्षा सुमारे अर्धा तास उशिराने प्रयोग सुरू झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या किती गंभीर बनली आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
‘ऑल द बेस्ट’ नाटकातले कलाकार रंगमंदिरात पोहोचल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम प्रेक्षकांची मनापासून माफी मागितली. झालेल्या गैरसोयीबद्दल खंत व्यक्त करत त्यांनी प्रेक्षकांच्या संयमाचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी कल्याणमधील वाहतूक व्यवस्थेवर आणि शहरातील खड्डेमय रस्त्यांवरही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे केवळ नागरिकांनाच नव्हे, तर कलाकार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही मोठा फटका बसत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
या घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील नागरिक चांगलेच संतापले असून प्रशासनाला पुन्हा एकदा सवाल केला आहे. वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. आता या समस्येचा परिणाम केवळ प्रवासापुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक कार्यक्रमांवर, कलाकारांवर आणि रसिकांवरही होऊ लागला आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.