
1980 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांचा दबदबा होता. ‘अँग्री यंग मॅन’ या भूमिकेमुळे ते त्या काळातील सर्वात मोठे सुपरस्टार बनले होते. मात्र, याच काळात एक असा चित्रपट आला ज्याने इतिहास घडवला आणि विशेष म्हणजे हा चित्रपट सुरुवातीला अमिताभ बच्चन यांना ऑफर करण्यात आला होता. पण त्यांनी हा प्रोजेक्ट फारसा प्रभावी नाही असे समजून नाकारला.
हा चित्रपट म्हणजे 1980 साली प्रदर्शित झालेला ‘कुर्बानी’. अमिताभ बच्चन यांनी नाकारल्यानंतर हा चित्रपट विनोद खन्ना यांच्याकडे गेला आणि त्यांनी तो स्वीकारला. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिग्दर्शक फिरोज खान यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती.
2.5 कोटी बजेट अन् कमाई…
‘कुर्बानी’मध्ये दमदार अॅक्शन, थरारक कथा आणि सुपरहिट गाण्यांचा संगम होता. चित्रपटातील गाणी आणि स्टाईलिश सादरीकरणाने प्रेक्षकांना भुरळ घातली. फक्त 2.5 रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 25 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. जी त्या काळात खूप मोठी कामगिरी मानली जात होती.
या चित्रपटाच्या यशामुळे विनोद खन्ना यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. ते अमिताभ बच्चन यांना टक्कर देणारे स्टार म्हणून उदयास आले. आधीपासूनच चांगले अभिनेता असलेले विनोद खन्ना यांना ‘कुर्बानी’ने नव्या उंचीवर नेले.
एका चित्रपटाने विनोद खन्नाचं बदललं आयुष्य
मात्र, त्यांच्या करिअरच्या शिखरावर असतानाच त्यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला. त्यांनी बॉलिवूडपासून दूर जात संन्यासाचा मार्ग स्वीकारला आणि Osho यांच्या आश्रमात राहण्यासाठी अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी जवळपास पाच वर्षे घालवली. नंतर ते भारतात परतले आणि पुन्हा चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना पूर्वीसारखे यश मिळू शकले नाही.
‘कुर्बानी’ हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिस हिट ठरला नाही तर त्याने एका अभिनेत्याचे करिअर पूर्णपणे बदलून टाकले. अमिताभ बच्चन यांनी नाकारलेला हा चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरला.