सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ‘फौजी’, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नव्या चित्रपटाची घोषणा

| Updated on: Aug 15, 2022 | 7:20 AM

‘फौजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन घनशाम विष्णूपंत येडे यांनी केले आहे. अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री सायली संजीव ही लोकप्रिय जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ‘फौजी’, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नव्या चित्रपटाची घोषणा
Follow us on

मुंबई : सैनिक (Soldier) देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्यामुळे आपण आपलं आयुष्य सुखाने जगू शकतो. कधी कुठे हल्ला झाला किंवा दंगली झाल्या तर आपण खंत व्यक्त करतो. नंतर मात्र अगदी सहज विसरून जातो. आपले सैनिक हातात बंदूक घेऊन कायम आपल्या रक्षणासाठी सतत सीमेवर खंबीरपणे पहारा देत असतात, तेदेखील कोणताही स्वार्थ न ठेवता. अशाच एका निडर सैनिकाचा जीवन प्रवास मांडणारा मातृपितृ फिल्म्स् प्रस्तुत घनशाम येडे निर्मित ‘फौजी’ देशाचा प्राण, ‘आन बान शान’ या मराठी चित्रपटाची (New Marathi Movie) घोषणा स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.

‘फौजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन घनशाम विष्णूपंत येडे यांनी केले आहे. अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री सायली संजीव ही लोकप्रिय जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यांच्यासोबत नागेश भोसले, सुनील गोडबोले, हंसराज जगताप, सिद्धेश्वर झाडबुके, रोहित चव्हाण, विवेक चाबुकस्वार, मिलिंद दास्ताने, जयंत सावरकर, मानसी मागिकर, सुहास गरगडे, विश्वजित बेलदार, संकेत तटकरी, घनशाम येडे हे कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत.

भारतीय ‘फौजी’ सीमेवर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी करताना प्राणाची पर्वा न कारता सदैव सज्ज असतो याची सर्वांना जाणीव व्हावी, युवा पिढीला देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी ‘फौजी’ चित्रपटाची निर्मीती केल्याचे निर्माते घनशाम येडे सांगतात. आपल्या देशासाठी, समाजासाठी आपला प्राणपणाला लावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नामधील काही रक्कम शहीद फौजींच्या कुटुंबांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

दिग्दर्शक निर्माते घनशाम येडे यांचा चंदेरी दुनियेचा प्रवासही तितकाच खडतर आहे. सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या घनश्याम येडे यांनी स्पॅाटबॉयचे काम करत अभिनयाचे धडे गिरवले. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटामधील त्यांची चहावाल्याची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. त्यानंतर कष्टाने लेखन, दिग्दर्शन अशी जबाबदारीही सांभाळत ‘बोला अलख निरंजन’ हा चित्रपट केला. त्यांचे आगामी मराठी व हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.

कथा,पटकथा,संवाद,गीते घनशाम येडे यांची आहेत. शान, वैशाली माडे, कविता राम यांनी चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवला आहे. छायांकन सरफराज खान तर संकलन कुणाल प्रभू यांचे आहे. सौ.स्वप्नजा नाथ विश्वनाथ, सतीश नाझरकर यांचे विशेष निर्मिती सहाय्य लाभले आहे. ध्वनी अनिल निकम तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील यांनी सांभाळली आहे. रंगभूषा आमोद दोषी यांची आहे. निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी महेश चाबुकस्वार यांनी सांभाळली आहे.