ए. आर. रेहमान यांच्या ‘कम्युनल’ टिप्पणीवर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन; म्हणाल्या “ते अशा टप्प्यावर नाहीत जिथे..”

AR Rahman controversy: ए. आर. रेहमान यांच्या सांप्रदायिक टिप्पणीवरून मोठा वाद झाला. या वादावर आता गायिका अनुराधा पौडवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे गेल्या 8 वर्षांपासून काम न मिळाल्याचं रेहमान यांनी म्हटलं होतं.

ए. आर. रेहमान यांच्या कम्युनल टिप्पणीवर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन; म्हणाल्या ते अशा टप्प्यावर नाहीत जिथे..
Anuradha Paudwal and AR Rahman
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 13, 2026 | 9:03 AM

ऑस्कर विजेते संगीतकार, गायक ए. आर. रेहमान यांनी इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेवरून मांडलेल्या मतामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अनेकांनी त्यावर आपापली मतं मांडली आणि त्यापैकी काहींनी रेहमान यांना चुकीचंही ठरवलं. इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे गेल्या आठ वर्षांत मला काम मिळालं नाही, असं रेहमान यांनी म्हटलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गायिका अनुराधा पौडवाल यांनी रेहमान यांच्या वक्तव्यावर आपलं मत मांडलं आहे. “ए. आर. रेहमान यांना मी त्यांच्या संगीतातूनच ओळखते. मी कधीच त्यांना वैयक्तिकरित्या भेटले नाही. पण त्यांचं संगीत सांगतं की ते अत्यंत सज्जन व्यक्ती आहेत”, असं अनुराधा म्हणाल्या.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “मी या इंडस्ट्रीचीच आहे आणि मी अनेकदा पाहिलंय की जेव्हा एखादा कलाकार, मग ते ए. आर. रेहमानच नाही तर कोणताही कलाकार मुलाखतीसाठी बसतो, तेव्हा मुलाखत घेणारे सहसा अशाप्रकारे प्रश्न तयार करून विचारतात, जेणेकरून त्यांना अपेक्षित असं उत्तर मिळेल. मीडिया, चॅनल्स यांना थेट किंवा सरळ मुलाखती आवडत नाहीत. कारण त्यांना दुसरं काहीतरी हवं आहे. रेहमान यांनी या संगीत विश्वात भरभरून योगदान दिलं आहे, त्यामुळे यांसारख्या वादापेक्षा ते मोठे आहेत.”

ए. आर. रेहमान यांनी आपल्याला खूप मोठे आकडे दिले आहेत आणि या सर्व वादांच्या पलीकडचे ते आहेत. त्यांनी खूप काही मिळवलंय. त्यामुळे ते अशा टप्प्यावर नाहीत जिथे कोणीही येऊन त्यांच्या करिअरला प्रभावित करू शकतील. एक ज्येष्ठ कलाकार म्हणून मला हेच वाटतं. त्यांनी गाण्यांमधून खूप कमाल काम केलंय, त्यामुळे या वादाला काहीच अर्थ नाही”, असं मत अनुराधा पौडवाल यांनी मांडलंय.

याआधी ‘IANS’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक सुभाष घई म्हणाले होते, “जातीय मुद्दे हे गेल्या बऱ्याच काळापासून समाजात चर्चेत आहेत आणि जे लोक त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करतात त्यांना अशा वादविवादांनी काही फरक पडत नाही. त्याचप्रमाणे मी हेसुद्धा सांगू इच्छितो की एखाद्याच्या एकाच विधानाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करून तो एक मोठा मुद्दा बनवू नका. जे लोक त्यांचं काम जाणतात, ते याने प्रभावित होत नाहीत. ते त्यांच्या कलेवर लक्ष केंद्रीत करतात. ज्यांना राजकारण करायचं आहे ते तेच करतात.”