Bhediya Review: ‘भेडिया’च्या क्लायमॅक्समध्ये जबरदस्त ट्विस्ट; वरुण धवनची दमदार कामगिरी

| Updated on: Nov 25, 2022 | 10:42 AM

वरुण धवनचा 'भेडिया' पहावा की पाहू नये? संभ्रमात असाल तर आधी हा Review नक्की वाचा!

Bhediya Review: भेडियाच्या क्लायमॅक्समध्ये जबरदस्त ट्विस्ट; वरुण धवनची दमदार कामगिरी
Bhediya
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई: क्रिएचर कॉमेडी हा बॉलिवूड चित्रपटांसाठी एक नवीन जॉनर आहे. दिग्दर्शक अमर कौशिकने नेहमीच त्याच्या चित्रपटांतून प्रेक्षकांना काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. वरूण धवन आणि क्रिती सनॉनची मुख्य भूमिका असलेला ‘भेडिया’ हा चित्रपटसुद्धा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. हा चित्रपट कसा आहे ते जाणून घेऊयात..

कथा-

दिल्लीच्या भास्करला (वरुण धवन) अरुणाचल प्रदेशमधल्या ‘जीरो’ या ठिकाणी रस्ता बनवण्याचा प्रोजेक्ट देण्यात येतो. जास्त नफा कमावण्याच्या लोभापायी भास्कर जंगलातून रस्ता काढण्याचा प्लॅन बनवतो. भास्करसाठी हा फक्त प्रोजेक्ट असला तरी ते जंगल तिथल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. प्रोजेक्टसाठी अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचलेल्या भास्करची भेट पांडाशी (दीपक डोब्रियाल) होते. स्थानिक लोक आणि भास्कर यांच्यातील कम्युनिकेटरचं काम तो करतो. याचदरम्यान पांडा ‘विषाणू’ या अफवाची माहिती भास्करला देतो. जंगलात एक विषाणू राहतो आणि जे लोक त्या जंगलाचं नुकसान करू पाहतात त्याची तो शिकार करतो, असं भास्करला सांगण्यात येतं. असंच एके दिवशी कामानिमित्त जंगलातून जात असताना भास्करवर एक लांडगा हल्ला करतो आणि त्याला चावतो.

लांडग्याशी सामना झाल्यानंतरच भास्करचं आयुष्य बदलचं. आपल्यात लांडग्याची एक वेगळीच शक्ती आली आहे, असं त्याला वाटू लागतं. इच्छाधारी लांडगा बनलेल्या भास्करला या समस्येतून सोडवण्यासाठी जनार्दन (अभिषेक बॅनर्जी), जेमिन (पालिन कबाक) आणि प्राण्यांची डॉक्टर (कृती सनॉन) त्याची मदत करतात. भास्करच्या प्रोजेक्टचं पुढे काय होतं, विषाणूची काय कथा आहे.. हे सर्व तुम्हाला चित्रपटात पहायला मिळेल.

हे सुद्धा वाचा

दिग्दर्शन-

क्रिएचर फिल्म आणि कॉमेडी अशा दोन भिन्न गोष्टींना जोडून दिग्दर्शक अमर कौशिकने क्रिएचर कॉमेडी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी त्यांच्या ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात अमर नेहमीच यशस्वी होतो. भेडियाची कॉमेडीसुद्धा अशीच आहे. हा चित्रपट कधी तुम्हाला जोरजोरात हसवतो तर कधी अचानक घाबरवतो. मध्यांतरापर्यंतचा हा चित्रपट उत्तम गतीने चालतो, मात्र मध्यांतरानंतर कथेची गती कमी झाल्याचं पहायला मिळतं.

या चित्रपटाच्या सीक्वेलची शक्यता कायम ठेवण्यासाठी क्लायमॅक्समध्ये कथेला तसा वाव देण्यात आला आहे. चित्रपटाची कथा काही ठिकाणी कमकुवत वाटते, मात्र कॉमेडी, व्हिज्युअल्स आणि दमदार अभिनय या जमेच्या बाजू ठरतात. यातील काही सीन्स तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील.

टेक्निकल

हा चित्रपट 3D मध्ये बनवल्यामुळे टेक्निकल टीमवर खूप मोठी जबाबदारी होती. व्हिज्युअल इफेक्ट्सवर खूप मेहनत घेण्यात आली आहे. व्हिएफएक्स आणि उत्तम सिनेमॅटोग्राफीमुळे लांडगा आणि जंगलातील गडद विश्व यशस्वीरित्या तयार करण्यात आलं आहे. सिनेमॅटोग्राफर जिष्णू भट्टाचार्य यांच्या कॅमेराची अशी जादू आहे की तुम्ही पहिल्या दृश्यापासूनच अरुणाचलच्या जीरो शहरामध्ये हरवून जाता.

अभिनय-

भास्करच्या भूमिकेतून वरुण धवनने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. चित्रपटात त्याची मेहनत साफ दिसून येते. शरीरयष्टी असो किंवा मग दमदार अभिनय.. वरुणने कुठेच निराशा केली नाही. स्क्रीन स्पेस कमी असल्याने कृती सनॉनच्या भूमिकेला तेवढा वाव मिळाला नाही. मित्राच्या भूमिकेत पालिन कबाक आणि दीपक डोब्रियाल यांनी उत्तम काम केलंय. तर भावाच्या भूमिकेत असलेला अभिषेक बॅनर्जी या सर्वांत भाव खाऊन जातो.

का पहावा चित्रपट?

वरुण धवनच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच आहे. या चित्रपटातील त्याची हटके भूमिका तुम्हाला निराश करणार नाही. एंटरटेन्मेंटसोबतच हा चित्रपट तगडा सामाजिक संदेशसुद्धा देतो. या चित्रपटाला थ्रीडीमध्ये पाहण्याची एक वेगळीच मजा आहे.