अंकिता लोखंडेनं पती विकी जैनला दिली थेट घर सोडण्याची धमकी; नेमकं काय घडलं?
बिग बॉसच्या घरात सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे अंकिता लोखंडे आणि विकी जैन. या दोघांमध्ये दररोज नवीन ड्रामा पहायला मिळतोय. नुकतीच अंकिताने विकीला घर सोडण्याची धमकी दिली. या दोघांमध्ये नेमकं काय घडलं, अंकिता विकीला असं का म्हणाली हे जाणून घेऊयात..

मुंबई : 28 नोव्हेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’च्या प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना भरभरून ड्रामा पहायला मिळतोय. घरातील इतर स्पर्धकांपेक्षा अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सर्वाधिक चर्चेत आहेत. या दोघांमध्ये सतत भांडण पहायला मिळतंय. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी ही जोडी बाहेर जितकी एकमेकांसोबत रोमँटिक होती, त्याच्या उलट दोघं बिग बॉसच्या घरात आक्रमक झाले आहेत. नुकत्याच एका एपिसोडमध्ये विकी आणि अंकिताची आई दोघांना समजावण्यासाठी पोहोचल्या होत्या. आता या सर्वांदरम्यान अंकिताने विकीला थेट धमकी दिली आहे. बिग बॉसचं घर सोडून जाईन, अशीच धमकी अंकिताने दिली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये विकी जैन हा समर्थ जुरेलसोबत अभिषेक कुमारच्या पर्सनॅलिटीबद्दल बोलत असतो. त्यानंतर विकीसोबत झालेल्या चर्चेचा खुलासा समर्थ अभिषेककडे करतो. हे ऐकल्यानंतर अभिषेक जेव्हा विकीसमोर जातो, तेव्हा तिघांमध्ये मोठा गैरसमज निर्माण होतो. याबद्दल अंकिता विकीला समजावत असते. खेळात पूर्णपणे सहभागी होऊ नकोस, असं ती विकीला म्हणते.
अंकिता पुढे म्हणते, “जर एखाद्याला तुझ्याशी बोलायचं नसेल, तर तू त्यांच्याशी बोलू नकोस. मी इथे तुझ्यासोबत आहे. ज्या लोकांना तुझ्यासोबत बसायचं आहे, ते तुझ्यासोबतच बसतील. ही लोकं कोण आहेत? ते कोणाबद्दल बोलत आहेत? त्यांना खेळाविषयी काहीच माहीत नाही. पण अशा गोष्टी घडत असतात. जेव्हा तू समर्थसोबत बोलत होतास, तेव्हा मी तुला इशारा दिला होता. तो तुझ्या पाठीत खंजीर खुपसणार, हे मी तुला आधीच सांगितलं होतं आणि अखेर तसंच झालं. समर्थ तुझ्यासोबत ज्या पद्धतीने बोलतो, ते मला आवडत नाही. तू त्यांच्या ओव्हर स्ट्रॅटेजीमध्ये फसला आहेस.”
यावेळी अंकिता विकीसोबत ‘वीकेंड का वार’ एपिसोडबद्दलही चर्चा करते. वीकेंड का वार एपिसोडमध्ये सूत्रसंचालक सलमान खानने विकी जैन आणि मुनव्वर फारुकीच्या गेम प्लॅनचा खुलासा केला. याबद्दल अंकिता विकीला पुढे म्हणते, “तू आणि मुनव्वर दोघं सहभागी होते. पण तू तुझं डोकं चालवून म्हणालास की तू खेळतोय. पण मुनव्वरने असं दाखवलं नाही. मुनव्वर सोडून घरातील इतर सदस्यांसोबत माझं नातं चांगलं आहे. शोमधून बाहेर पडल्यानंतरही मी त्यांच्या संपर्कात राहीन.”
“ज्या लोकांनी तुझा अनादर केला, ते माझ्या घरी येणार नाहीत. हा एक खेळ आहे हे मला मान्य आहे. पण त्याच लोकांना तू आणलंस तर मी घर सोडून निघून जाईन. मुनव्वरची खेळण्याची स्वत:ची एक वेगळी पद्धत आहे. तो खूप चतूर आहे. तुझी खेळी सर्वांना समजली आहे. त्यामुळे तुझ्यावर आता कोणाचा विश्वास नाही राहिला”, अशा शब्दांत अंकिता विकीला समजावत असते.