45 दिवसात तयार झालेला चित्रपट, थिएटरमध्ये 952 दिवस होता हाऊसफुल, ट्रॅक्टर, ट्रक आणि बैलगाड्यांमधून बघायला यायचे लोक
45 दिवसांमध्ये तयार झालेला चित्रपट, जो प्रदर्शित होताच 952 दिवस थिएटरमध्ये होता हाऊसफुल. 44 वर्षानंतर देखील या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये होती प्रचंड क्रेझ. आजही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उडते झुंबड.

मोठे स्टार, कोट्यवधींचं बजेट आणि भव्य सेट असला की चित्रपट सुपरहिट होतो असं नाही. दमदार कथा, साधी माणसं आणि नात्यांमधील भावनिक ऊब असेल तर कमी बजेटमधील चित्रपटही प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1982 मध्ये प्रदर्शित झालेला ‘नदिया के पार’. अवघ्या 18 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अशी कामगिरी केली की आजही त्याची चर्चा होते.
राजश्री प्रॉडक्शन्सच्या या कौटुंबिक चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशातील ग्रामीण वातावरणावर आधारित होती. त्या काळात अॅक्शन आणि मसालापटांचा बोलबाला असताना ‘नदिया के पार’ने साधी, भावनिक आणि ग्रामीण पार्श्वभूमीवरील प्रेमकथा प्रेक्षकांसमोर आणली. चंदन आणि गुंजा यांच्या निरागस प्रेमकथेने प्रेक्षकांची मनं जिंकली.
अवघ्या 18 लाखांत चित्रपटाची निर्मिती
त्या काळात राजश्री प्रॉडक्शन्सच्या एका सामान्य चित्रपटासाठी साधारण 50 ते 60 लाख रुपयांचा खर्च होत असे. मात्र ‘नदिया के पार’साठी निर्मात्यांनी अत्यंत मर्यादित बजेटचा वापर केला. हा चित्रपट फक्त 18 लाख रुपयांत पूर्ण करण्यात आला. विशेष म्हणजे, संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग अवघ्या 45 दिवसांत पूर्ण झालं.
कमी बजेट असूनही निर्मात्यांनी कथा, संगीत आणि चित्रपटाच्या गुणवत्तेशी तडजोड केली नाही. याच साधेपणामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.
खऱ्या गावात झालं शूटिंग
चित्रपटाला अस्सल ग्रामीण वातावरण मिळावं यासाठी स्टुडिओमध्ये कृत्रिम सेट उभारण्याऐवजी निर्मात्यांनी प्रत्यक्ष लोकेशनवर शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटातील बहुतांश शूटिंग उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील विजयपूर गावात करण्यात आलं.
गावातील खरी घरं, शेतं आणि नैसर्गिक वातावरण यामुळे चित्रपटातील प्रसंग अधिक जिवंत वाटले. प्रेक्षकांना पडद्यावर एखादा बनावटी सेट न पाहता खरंच आपल्या गावातील माणसांची कथा पाहत असल्याचा अनुभव मिळाला. चित्रपटाचा क्लायमॅक्स मात्र मुंबईत शूट करण्यात आला होता.
136 आठवडे हाऊसफुल
‘नदिया के पार’ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. विशेषतः तत्कालीन इलाहाबादमध्ये या चित्रपटाची अभूतपूर्व क्रेझ पाहायला मिळाली. तिथल्या काही चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट तब्बल 136 आठवडे, म्हणजे सुमारे 952 दिवस हाऊसफुल चालल्याचं सांगितलं जातं.
चित्रपट पाहण्यासाठी ग्रामीण भागातून लोक ट्रॅक्टर, ट्रक आणि बैलगाड्यांमधून संपूर्ण कुटुंबासह सिनेमागृहात येत असत. चित्रपटातील चंदनची भूमिका साकारणारे सचिन पिळगावकर यांनीही या यशाच्या आठवणी एका मुलाखतीत सांगितल्या होत्या.